जुन्या आठवणी, विवेकानंद शाळेचे माजी विद्यार्थी सचिन मराठे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या शाळेसाठी भावनिक लेख लिहला आहे…

*” तो पिंपळ वृक्ष ” एक साक्षीदार…..!*

गेली कित्येक दशके हा ‘जुन्या’ विवेकानंद विद्यालयातील कित्येक पाखरांना सुरक्षित आसरा देणारा, मधमाश्यांच्या पोळ्या साठी आपल्या बहारदार शाखा पसरलेला हा पिंपळ वृक्ष आजही तटस्थ उभा आहे..
वारा, वादळ, पाऊस यांचा सामना करत आपले अस्तित्व टिकवून आहे.
आम्ही व आमच्या आधी वणीतील कित्येक रथी-महारथी या वृक्षाच्या सावलीत मनसोक्त रममाण झाले होते..
कित्येकांच्या शालेय शिक्षणातील मिळालेल्या यश अपयशाचा हा पिंपळ वृक्ष साक्षीदार आहे.
कित्येकांनी या वृक्षाच्या खोडावर आपले व त्या वेळच्या आपल्या आवडत्या सोबत्याचे नाव पण कोरलेले आहे.
ते आज पण निहाळून बघितले तर दृष्टीस पडते..
जितक्या खोलवर ह्या पिंपळाचे मुळे गेली आहेत, तितक्याच खोलवर त्या शालेय जीवनातील आठवणी आमच्या हृदयात खोलवर रुजलेली आहेत.
शाळा घराजवळ असल्याकारणाने शाळेची घंटा नाद होताच घरातून धावत शाळेत जाण्याचा तो नित्याचा क्रम..
शाळा दोन पाळीत भरायची , सकाळी 7 ते 11:45 पर्यंत व दुपारची 11:45 ते 5:20 पर्यंत
शाळेच्या आधी होणाऱ्या प्रार्थने करिता उपस्थित राहण्याची त्यावेळची कसरत फारच चॅलेंजिंग असायची कारण शाळेच्या एन्ट्री गेट वर मा. श्री चिखले सर यांचा फुल्ल युनिफॉर्म मधला दरारा हा कमालीचा वाखांन्या जोगा होता. त्यांच्या भीती पोटी कधीच कोणी शाळेत उशिरा येण्याचे जाणून बुजून तरी प्रयत्न करीत नव्हते, पण एखाद्या वेळेस काही कारना निमित्त जर उशीर झालाच तर तो एन्ट्री गेट कसा पार करायचा ही मोठी कसरत होती. सरांना कोणते कारण सांगायचे जेणे करून हातावर रुळाचे फटके मिळणार नाही याचा वेगळाच सराव त्या वेळेसच्या विद्यार्थांना होता. त्यात ही शाळेचा ड्रेस सोडून इतर ड्रेस घालून शाळेत प्रवेश म्हंनजे त्याहून ही मोठे आव्हान..
अ , ब, क, ड, इ, त्या वेळची पाच वर्ग श्रेणी होती. त्यात आमचा “ड”.. त्याचा अपभ्रंश पुष्कळदा आमच्या इंटेलिजन्स मुळे “ढ” असाही व्हायचा.
वर्गात गेलो की आमचा शेवटचा बेंच ठरलेलाच होता, गैरसमज नसावा.. “तो आमच्या बौद्धिक स्तरा नुसार नसून शारीरिक उंची मुळे आमच्या वाट्याला आला होता.”
पहिला पिरेड 45 मिनिटांचा व उर्वरित 35 मिनिटांचे असे आठ पीरेड असायचे.
मधात 2:40 ते 3:10 पर्यंत जेवणाची सुट्टी असायची, त्यात कोणी डब्बे तर कोणी घरून जेवण करून यायचे..
शाळेत डब्बे आणणारे विशेष वाटायचे, प्रत्येक जण आपापल्या डब्यातले एक-दुसर्यास शेयर करायचे डब्बात भाजी पोळी जरी नेमकी असायची पण जिव्हाळा हा ओतप्रोत होता.. ना गरीबी श्रीमंतीची आडकाठी न जाति-धर्मांची.
निस्सीम मैत्री प्रेम हा एकच धर्म, ज्याचे सर्व पालन करायचे. ❤️
घर शाळे जवळ असल्याकारणाने मी कधीच डब्बा नेला नाही, त्यामुळे ह्या प्रीतीपूर्ण खमंग मेजवानीचा मला आस्वाद घेता आला नाही.
विशेष करून मुली शाळेच्या बाहेरील बाजूला बसलेल्या बोरवाल्या आज्जी कडून बोरं, गूळबोर, नड्डे, येरूंन्या, टेंभरें, चारं, चिंचा.. यांचा त्यांच्या रुमालात घेऊन फराळ करायच्या.
आताचे विद्यार्थी हे फक्त जंग फुडच खाण्यात धन्यता मानतात.
सगळ्यां मुलींच्या आपआपल्या जोड्या ठरलेल्या होत्या. एखादीने सुट्टी घेतली तर दूसरी वर्गात हिरमुसली बसून असायची.. हे विशेष.
स्वातंत्र्य दीना निमित्त शासकीय मैदानावर होणार्या कार्यक्रमात तीन-तीन च्या लायनीत चालणे ह्यात पण एक वेगळाच आनंद असायचा.
मुख्याध्यापक दे. मा. ठावरी सर. आणि उपमुख्याध्यापक गोलर सर आणि गंगशेट्टीवार सर ह्यांचा पण दरारा जोरदारच.. 🙏
हे वर्गात विजिट द्यायला आले की वर्ग कप्तान क्लास स्टँडअप अशी घोषणा द्यायचा आणि लगेच पूर्ण वर्ग उभा व्हायचा.
शाळे व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही आमचे शिक्षक जरी दिसले तरी आम्हि आदरापोटी माना खाली करूनच त्यांच्या समोरून निघायचो, किंवा रस्ताच बदलायचो.
हल्लीच्या विद्यार्थ्यां मध्ये हा रिस्पेक्ट आता फारसा दिसत नाही.
वर्गात तसे ब्रिलियंट विद्यार्थी पण होते, कुणी एवरेज तर कुणी फक्त शाळेत नाव टाकले म्हणून यायचय ह्या हेतू चे पण होते. 😁
आमचा मागच्या बेंच वर च्या सहविध्यार्थांचे आवडते विषय म्हंजे पी. टी. आणि हिंदी..
पीटी चे इंगोले सर, आमच्या वर्गाला लाभले होते, खोडकर विद्यार्थ्यांची पुण्याईच समजावी की चिखले सर आम्हाला लाभले नाही. इंगोले सर शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, त्यांचा पिरेड टेन्शन मुक्त असायचा. दुसरे शिक्षक हिंदीचे “खान सर” हे आमचे सर्वात आवडते शिक्षक..💐
इतर विषयाचे पिरेड एखाद वेळेस ऑफ करून बुट्टी मारली ही असेल, पण हिंदी चा पिरेड कधीच ऑफ केला असेल हे आम्हाला आठवत नाही.
त्यांची शिकवण्याची शैलीच लयी भारी होती.. एखादा धडा ते बिलकुल एखाद्या गोष्टी प्रमाणे समजावून सांगत असत. त्यात जे विद्यार्थी त्यांचे लक्ष देऊन ऐकत नसे त्यांना “त्या दोन हमालाचे” हमखास उदाहरण द्यायचे शिक्षणात लक्ष न दिल्यास ढकल गाडी ढकलावी लागते, मजुरी करावी लागते, हे त्या उदाहरणाने मर्म होते. त्या मुळे ते आजही स्मरणात आहे.
इंग्रजी साठी सदैव प्रसन्नचित असणारे टोंगे सर लाभले..
इतर शिक्षक पण जोरदार होते इतिहासाचे बाकडे सर असो की रसायन शास्त्राचे तेलंग सर, त्यांना त्यांच्या विषयातल्या त्यांच्या घटना व त्यांच्या सज्ञा अगदी मुखपाठ होत्या.. पण त्या आम्हाला कधी आत्मसात होऊ शकल्या नाही याची खंत आहे.
उंच धिप्पाड ठाकरे सर जीवशास्त्र व नागरिक शास्त्र शिकवायचे तसे ते कुल पण कधी पारा भडकला की मग विद्यार्थ्यांची खैर नसे.
विज्ञान प्रयोगशाळेत फक्त ऑक्सिजन बनविण्याचे एकच प्रॅक्टिकल तेव्हढे माझ्या स्मरणात आहे. 🤷♂️
मराठी साठी या शालेय प्रवासात बोंडे सर, व आवारी मैडम हे विषयात निपुण व पारंगत शिक्षक आम्हाला लाभले.
गणितासाठी वाटेकर सर होते.. त्यांचा आमच्या बैक बेंचर साठी ठरलेला डायलॉग होता.. तुम्ही फळ्या कडे कशाला तोंड करून आहात रे, चला मागे भिंती कडे पाहा.. इकडे तुमच्या कामाचे काही नाही. ते आम्हाला कधी प्रश्न पण विचारत नव्हते, हे त्यांचे आमच्यावर उपकारच म्हणावे लागेल.
एकदा आमच्या पैकीच् एकाला त्रिकोणी समीकरणाला सरळ रूप द्या हे सोडवायला सांगितले तर पठ्ठा त्या त्रिकोणी समीकरणांची फळ्यावर एका सरळ रेषेत मांडणी करून मोकळा झाला, असा होता आमच्या बॅक बैंचर वाल्यांचा आपल्या शिक्षकांप्रति आज्ञाधारक पना.. सरळ म्हणजे सरळ, तेही एका रेषेत..विलक्षण बुद्धिमत्ता.😁
घटक चाचणीतही घाम फुटायचा इतके ब्रीलियंट स्टूडेंट आम्ही, मागच्या दोन बेंच वर साधारण सम बुध्दीचेच असायचे त्या मुळे कोणाच्या उत्तर पत्रिकेत डोकावयाचे हा एक अवघडच टास्क होता आमच्या साठी. तरी कसं बस वेळ काढून नेत होतो.
पावसाळ्यात छत टपकायचे तेव्हा बेंच सरकवायची वेगळीच कसरत असायची.
जास्तच पाऊस झाला की सुट्टीची घन्टा वाजवायला
पियुन म्हणून डोंगरे काका, लेडांगे, शिदूरकर, आणि जुमनाके हे असायचे. आमच्या वेळेस ह्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले.
वर्गात मुलं मुली दोन्ही असायची त्या मुळे थोडे शिस्तीतच वागावे लागत.
त्या वेळेस कोण्या मुलाने मुलींसोबत बोलणे म्हंजे फारच धैर्यवान असावं लागत. हाय, हॅलो हे सर्व अपरिचित शब्द होते आमच्या साठी.
आकर्षण- बीकर्षण बस तेव्हढ्या पुरतेच. Love बीव हे सर्व गौण विषय.
सहली मध्ये फार हिम्मत करून थोडे फार बोललो असेल तेव्हढेच आमचे बोलणे.
दुपारच्या सुट्टी मधून शाळेला बुट्टी मारली की दुसऱ्या दिवशी कप्तान आमचे नावे लिहून वर्ग शिक्षकास देत असे, त्याची शिक्षा कधी डस्टरचा मार, तर कधी पालकांना घेऊन येण्याची शिक्षा, ही आमच्या वाट्याला ठरलेलीच होती.
काही असो पण ते दिवस फार सुखद होते..
होमवर्कच फारसे ओझे नव्हते.. शाळेची फी हा विषयच नव्हता.
आज सहज घरच्या गच्चीवर निवांत बसलो होतो, पिंपळा कडे लक्ष गेले आणि जुने दिवस आठवले.. आज त्या ठिकाणी शाळेची इमारत राहिली नाही, तिथे मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार झाले आहे.
शाळा ब्राम्हणी रोड ला स्थलांतरित झाली आहे जागा ही फार मोठी व इमारत पण मोठी सुसज्य अशी बांधण्यात आली आहे.
पण आम्ही ज्या ठिकाणी आपल्या जीवनाचे सुवर्ण दिवस घालवले ती आमची शाळा ही आमच्या साठी एक भव्य वास्तूच होती हे ही तितकेच खरं.
सोबत शिकलेले सर्व पांगापांग झालेत, मुली लग्न करून बाहेरगावी गेल्यात अणि वर्गमित्र आता आपआपल्या संसारात नौकरी व्यवसायात व्यस्त आहेत. सर्वांवर आपआपल्या जबाबदार्या आहेत त्यामुळे आता कुणाचीच भेट होत नाही.
आता परत कधी तरी सर्वांना भेटावं वाटते,
सर्वां सोबत मनमोकळेपणाने गप्पागोष्टी कराव्या वाटतात, कळत नकळत काही चुका झाल्या असतिल तर त्यांच्या क्षमा मागून मन हलके करावंसं वाट्ते..
जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांचे आभार मानावे हीच एक तेवढी ईच्छा मनात घिरट्या घालत असते. 🙏🙏
लेखन ✍️ सचिन जॉन मराठे, वणी. जिल्हा यवतमाळ.
Mo- 9923383036

























