सिटी हब मिडिया वणी…
वणी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ. प्रमीला मनोज चौधरी यांनी नगराध्यक्ष सौ. विद्या ताई खेमराज आत्राम यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. प्रभागातील स्वच्छता, रस्ते, नाले व नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी स्पष्ट मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना गेल्या काही काळापासून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः स्वच्छतेचा प्रश्न हा सर्वाधिक गंभीर असून अनेक ठिकाणी नाल्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे.

नगरसेविका सौ. प्रमीला चौधरी यांनी पुढील प्रमुख मुद्द्यांकडे नगरपरिषदेचे लक्ष वेधले आहे :
प्रमुख मागण्या :
१) नवीन सिमेंट काँक्रिट रस्ते :
प्रभागातील अनेक भागांमध्ये अंतर्गत रस्ते पूर्णतः खराब झाले असून नागरिकांना चालणे तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गुरुनगर, खाती चौक, विराणी हॉल परिसर, बेलदारपुरा, शिवाजी आखाडा आदी भागांत नवीन सिमेंट काँक्रिट रस्ते तातडीने बांधण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
२) नाल्यांचे झाकण-चेंबर नवीन बसवणे :
प्रभागातील विविध ठिकाणी नाल्यांचे झाकण तुटलेले अथवा गायब असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
खाती चौक, विराणी हॉल रोड, जनता शाळा परिसर, काळे हॉस्पिटल परिसर आदी ठिकाणी नवीन झाकण-चेंबर बसवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
३) अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) काही रस्त्यांवर वाहनांचा वेग अधिक असल्याने वारंवार अपघात होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळे हॉस्पिटल ते ठाकरे हॉस्पिटल मार्गासह इतर ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
४) सार्वजनिक स्वच्छता व कचरा व्यवस्थापन :
इंदिरा चौक, खाती चौक व इतर भागांमध्ये कचरा साचत असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. संबंधित ठिकाणी कचरा नियमित उचलून परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
ललिता चव्हाण यांच्या घराजवळील कचऱ्याचा प्रश्नही तातडीने मार्गी लावावा, असे नमूद करण्यात आले आहे.
५) अंडरग्राऊंड नाल्यांची साफसफाई :
खाती चौक, गुरुनगर, विराणी टाकीज परिसर, इंदिरा चौक, बेलदार पुरा आदी ठिकाणी अंडरग्राऊंड नाल्यांची नियमित साफसफाई करून दुर्गंधी व साचलेल्या पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
६) सार्वजनिक संडास व पिण्याच्या पाण्याची सुविधा :
खाती चौक येथे नगरपरिषद संडास बंद असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सदर संडास बंद करून त्या जागेवर बाग विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच इंदिरा चौक येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता नगरपरिषदेतर्फे ‘वॉटर एटीएम’ बसवण्यात यावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करून प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नगरसेविका सौ. प्रमीला चौधरी यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असून नगरपरिषद प्रशासनाने लवकरात लवकर ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


























