सिटी हब मिडिया वणी…
नेतृत्वात जर ठामपणा, धैर्य आणि जनतेसाठी लढण्याची तयारी असेल, तर प्रशासनालाही अखेर झुकावे लागते—याचा प्रत्यय खांदला गावात पुन्हा एकदा आला आहे. मागील काही वर्षांपासून खांदला व परिसरातील गावांमध्ये वेकोलीच्या कोळसा वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले होते. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कॅन्सरसह विविध आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले होते.

वेकोलीच्या अवजड वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. धूळ, धूर आणि प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले होते. केवळ माणसांनाच नव्हे तर जनावरांनाही याचा मोठा फटका बसत होता. जनावरांच्या आरोग्यात बिघाड, चाऱ्याचा रंग बदलणे, शेतीवर होणारे परिणाम यामुळे गावकरी हतबल झाले होते. खांदल्यासह आसपासची किमान सहा गावे या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती.
या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर आणि खांदला गावाचे सरपंच हेमंत गौरकार यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, दखल घेतली जात नसल्याने अखेर गावकऱ्यांच्या सहकार्याने खांदला रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान वेकोलीची संपूर्ण कोळसा वाहतूक ठप्प करण्यात आली आणि एकही कोळसा वाहून जाऊ दिला गेला नाही.
या ठोस आणि आक्रमक आंदोलनामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि गावकऱ्यांना वेकोलीच्या वाहतुकीमुळे झालेल्या त्रासाबाबत दिलगिरी व्यक्त केली. यापुढे नागरिकांच्या आरोग्याला आणि शेतीला कोणतेही नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच गावकऱ्यांसाठी नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील, अशी ग्वाहीही देण्यात आली.
या आश्वासनांचा प्रत्यय आज दिनांक १०फेब्रुवारीला प्रत्यक्षात आला. खांदला गावात तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वेकोलीच्या अधिकाऱ्यांसह घुग्गुस येथील राजीव रतन हॉस्पिटलमच्या डॉक्टऱ्यांचा चमूने गावकऱ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली, आजारांबाबत माहिती घेतली आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. भविष्यातही अशा प्रकारची शिबिरे नियमितपणे घेतली जातील, असे स्पष्ट करण्यात आले.

तसेच एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास त्यांच्यावर घुगुस येथील राजीव रतन रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतील, अशी ठाम भूमिका वेकोली प्रशासनाने जाहीर केली आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वेकोलीने आपली भूमिका स्पष्ट करत गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा मानस दाखवला आहे.
एकूणच, विजय पिदुरकर यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आणि हेमंत गौरकार यांच्या सक्रिय भूमिकेमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आणि प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागली. लोकांच्या प्रश्नांसाठी लढणारे नेतृत्व असेल, तर कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाला झुकावेच लागते हे खांदला प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

























