वणीमध्ये उबाठामध्ये अंतर्गत असंतोष? सलग दोन पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने चर्चा
वणी विधानसभा क्षेत्रातील उबाठा राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सु. शेंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केल्यानंतर आता पक्षातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यांनी आपला राजीनामा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सादर केला आहे.

शेंडे यांनी निवेदनात नमूद केले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे सामाजिक व जनहिताचे विविध उपक्रम राबवले. मात्र, अलीकडच्या काळात स्थानिक पातळीवर आपल्या कार्यात अडथळे निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महत्त्वाच्या बैठका, निर्णयप्रक्रिया व जागावाटपात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उबाठाचे निष्ठावंत शिवसैनिक राजु तुराणकर यांनीही पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यांनीही पक्षातील परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत “पक्ष एकप्रकारे हायजॅक झाला असून काही मोजक्या लोकांचेच म्हणणे ऐकले जाते, निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाते,” अशी खंत मांडली होती.
आधी राजु तुराणकर आणि आता अजिंक्य शेंडे यांच्या सलग राजीनाम्यांमुळे वणीतील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे की उबाठामध्ये सर्व काही आलबेल नसून संघटनात्मक पातळीवर असंतोष वाढत आहे. काही कार्यकर्त्यांच्या मते, पक्षातील निर्णयप्रक्रिया मर्यादित गटापुरतीच राहिली असून इतरांना पुरेशी संधी दिली जात नाही.

या पार्श्वभूमीवर उबाठामध्ये अंतर्गत पुनर्रचना होणार का, की असंतोष आणखी वाढणार, याकडे आता स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

























