वणीच्या राजकीय वर्तुळात दिवाळी नंतर पुन्हा एकदा मोठी खळबळ उडणार आहे.
नुकतेच भाजप महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांनी भाजपला रामराम करत शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश घेतला त्यांच्या सोबत त्यांचे समर्थक राहुल मुंजेकर आणि कॉंग्रेससोबत अनेक वर्षांपासून असलेले आशिष काळे यांनी ही प्रवेश घेतला आहे.
यानंतर वणीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, त्यांच्या सोबत आणखी काही नाराज व असंतुष्ट नेते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
विश्वासभाऊ नांदेकर यांच्या नेतृत्वाखालील रणनीतीमुळे ही हालचाल सुरू असल्याचे बोलले जात आहे. वणी शहरातील अनेक माजी नगरसेवक, उबाठा आणि काँग्रेसमधील काही पदाधिकारी सध्या विश्वासभाऊ नांदेकर यांच्या संपर्कात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. यामुळे येत्या काळात वणीच्या राजकारणात आणखी काही “बॉम्ब” फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
स्वतः विश्वास नांदेकर यांनीही संकेत दिले आहेत की, “वणीतील विविध पक्षांतील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते आमच्या विचारसरणीकडे आकर्षित होत आहेत. शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षात येण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आणखी काही मोठ्या प्रवेशाची घोषणा होईल.”
वणी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरातील अनेक नेते व कार्यकर्ते आपल्या राजकीय भूमिकेचा फेरविचार करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुका अधिक रंगतदार आणि रोचक होणार, यात शंका नाही.

























