शेतकऱ्यांच्या शेतमालाला न्याय्य भाव मिळावा यासाठी वणी विधानसभेतील शिवसेना कार्यकर्त्यांनी उभाटाचे आमदार संजय दरेकर यांच्या नेतृत्वाखाली वणीतील टिळक चौक येथे विरोध प्रदर्शनाचे आयोजन केले. या आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी चटणी भाकर खाऊन सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला.

तसेच यावेळी सरकारच्या आश्वासनाची होळी ही करण्यात आली…
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारवर आरोप केला की, शेतकऱ्यांना फक्त आश्वासन दिले जात आहेत, प्रत्यक्षात मात्र काहीही मदत मिळालेली नाही. हेक्टरी १८,५०० रुपये मदतीची घोषणा फसली असून, शेतकऱ्यांच्या खिशात काहीही पडलेले नाही, असे शेतकरी उपस्थितांनी सांगितले.
यावेळी आंदोलनात अनेक शेतकरी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सरकारच्या शेतीसंबंधी विधेयकाचा निषेध करताना शेतकऱ्यांनी त्वरित मदत आणि त्यांच्या उत्पादनाला न्याय्य भाव देण्याची मागणी केली. कापसाला १५,००० आणि सोयाबीनला १०,००० रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, अशी यावेळी ठाम मागणी करण्यात आली.
भाषण करताना आमदार संजय दरेकर, शिवसेनेचे नेते संजय निखाडे, विनोद ढुमणे, सुनील कातकडे,दिलीप काकडे यांच्यासह अनेकांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले की, शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहील. जरी काही शिवसैनिकांवर गुन्हे दाखल असले तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही मागे हटणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या या चटणी भाकर आंदोलनाद्वारे सरकारवर दबाव आणत शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

























