सिटी हब मिडिया वणी…
वणी शहराच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २ जानेवारी १९७४ रोजी महागाईविरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात सात निष्पाप नागरिक हुतात्मा झाले होते. वाढत्या महागाईच्या विरोधात नागरिकांनी मोर्चा काढला असता, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या अटक करण्यात आलेल्या नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी कॉम्रेड शंकरराव दानव यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला व त्यानंतर गोळीबार करण्यात आला. या अमानुष कारवाईत मोर्चामध्ये सहभागी असलेले सात जण मृत्युमुखी पडले. या हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वणीतील टिळक चौकात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले असून, त्या स्मारकावर या आंदोलनात शहीद झालेल्या सातही हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत. दरवर्षी २ जानेवारी रोजी या हुतात्म्यांना अभिवादन करून त्यांचे स्मरण केले जाते.
याच परंपरेनुसार, यावर्षी भाजपचे प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक लक्ष्मण उरकुडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी टिळक चौकातील हुतात्मा स्मारक परिसरात उपस्थित राहून स्मारकाची स्वच्छता केली. यानंतर त्यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले.
नगरसेवक लक्ष्मण उरकुडे हे सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून वणीशी संबंधित विविध प्रश्न मांडत असतात. हुतात्म्यांच्या स्मृती जपाव्यात आणि नव्या पिढीला या ऐतिहासिक घटनेची जाणीव व्हावी, या उद्देशाने त्यांनी परिसराची स्वच्छता करून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
या वेळी त्यांच्या सोबत
विलास पारखी, राहुल दानव, जितेंद्र डाबरे, तुषार उपरे व इतर सहकारी यांची उपस्थिती होती.

























