सिटी हब मिडिया वणी…
वणी नगरपरिषद निवडणूक 2025 : भाजप स्पष्ट बहुमतासह सत्तेत, उबाठा–काँग्रेसला मर्यादित यश; अनुभवी गटनेत्यांकडे विकासाची धुरा…
वणी नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पद जिंकत, सोबतच 18 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत नगरपालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत उबाठा शिवसेनेला 6 तर काँग्रेसला केवळ 3 जागा मिळाल्या. विशेष म्हणजे उबाठा शिवसेना व काँग्रेस यांनी एकत्र येत 29 जागांसाठी निवडणूक लढवली होती; मात्र त्यांना मिळून फक्त 9 जागांवरच यश मिळाले. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून उबाठा शिवसेनेने प्रभाग क्रमांक 8 मधील विजयी उमेदवार सुधीर थेरे यांची नगरपालिकेतील गटनेता म्हणून नियुक्ती केली आहे. तर काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक 6 मधून विजयी झालेल्या तसेच माजी नगराध्यक्ष करुणा कांबळे यांची काँग्रेस गटनेता म्हणून नियुक्ती केली आहे.
यापूर्वी भाजपने प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक राकेश बुग्गेवार यांची भाजप गटनेता म्हणून निवड करून सत्ताधारी पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. गटनेता ही भूमिका केवळ पक्षीय नसून सत्ताधारी व विरोधकांमध्ये समन्वय साधणारी, विकासकामांना गती देणारी महत्त्वाची जबाबदारी मानली जाते.
उबाठा गटनेते सुधीर थेरे यांना नगरपरिषद राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी अर्चना थेरे या सुद्धा माजी नगराध्यक्ष राहिल्या असून, त्यामुळे थेरे कुटुंबाला नगरपालिकेच्या प्रशासनाचा सखोल अनुभव आहे. दुसरीकडे काँग्रेस गटनेत्या करुणा कांबळे या स्वतः माजी नगराध्यक्ष असल्याने नगरपरिषदेच्या कामकाजाची, निधी वितरणाची व विकास प्रक्रियेची त्यांना उत्तम जाण आहे.
भाजपकडे स्पष्ट बहुमत असून उपाध्यक्षपद, स्वीकृत सदस्य नियुक्तीचे अधिकारही भाजपकडेच राहणार आहेत. त्यामुळे आगामी काळात नगरपालिकेतील निर्णयप्रक्रियेत भाजपचे वर्चस्व राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे उबाठा व काँग्रेसने निवडणूक प्रचारात स्वतंत्र वाटचाल केल्याचा फटका निकालात स्पष्टपणे दिसून आला.
आता गटनेत्यांच्या नियुक्तीनंतर नगरपालिकेतील प्रशासन कशा प्रकारे चालते, विकास निधी आपल्या-आपल्या प्रभागात आणण्यात हे गटनेते किती प्रभावी ठरतात आणि सत्ताधारी भाजपसोबत समन्वय साधून वणीच्या सर्वांगीण विकासासाठी कसे काम केले जाते, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे. अनुभवी नेतृत्वाचा उपयोग शहराच्या विकासासाठी व्हावा आणि निवडणुकीदरम्यान दिसलेली राजकीय तुटातूट नगरपालिकेच्या कामकाजात अडथळा ठरू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

























