सिटी हब मिडिया वणी…
वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला एकहाती विजय हा विकासकामांचा विश्वास, संघटनात्मक ताकद आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या तन-मन अर्पून केलेल्या कार्याचा परिणाम असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा सचिव तथा माजी नगरसेवक संतोष डंभारे यांनी केले आहे. वणीतील भाजपच्या विजयाबाबत समाधान व्यक्त करताना त्यांनी ही प्रतिक्रिया सिटी हब मीडियाशी बोलताना दिली.
सन २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले संतोष डंभारे यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधा तसेच विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्या काळात सुरू केलेली तसेच काही अपूर्ण राहिलेली विकासकामे पुढील काळात पूर्णत्वास नेली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी संतोष डंभारे यांनी तन-मन अर्पून काम केले. प्रचार, जनसंपर्क, बैठका तसेच संघटनात्मक पातळीवर ते सातत्याने सक्रिय राहिले. भाजपचे जिल्हा सचिव म्हणून पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांची आवर्जून उपस्थिती असते. पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यामध्ये ते नेहमीच अग्रेसर असून, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
संतोष डंभारे म्हणाले की, “मागील पाच वर्षांत आमच्या टीमने वणीच्या विकासासाठी भक्कम पाया घातला आहे. आता भाजपची नवी टीम पुढील पाच वर्षांत या कामांना गती देत वणीच्या विकासाला नवे आयाम देईल.”
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांच्या नेतृत्वात भाजपची नवनिर्वाचित टीम जोमाने काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, कुठलीही अडचण उद्भवल्यास आपल्या अनुभवाचा लाभ नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना देण्यासाठी आम्ही सदैव तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संतोष डंभारे यांनी वणीकर जनतेला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच, भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्याताई आत्राम आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करत वणी शहराचा विकास अधिक गतीने पुढे जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
या निवडणुकीत भाजपचे १८ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे एकूण १९ उमेदवार निवडून आल्याने वणी नगरपालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळाली आहे. या यशामागे संतोष डंभारे यांच्यासारख्या निष्ठावान, विचारधारेशी समर्पित कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असल्याचे मत पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले जात आहे.

























