वणी शहरातील नांदेपेरा रोडवर सध्या राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि ठेकेदार यांच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. हा रस्ता आता चौपदरी करण्यात आला असून राज्य महामार्गाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, रस्त्याचे काम प्रगतिपथावर असतानाही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून अद्याप रस्त्यावरील वीज खांब हटविण्यात आलेले नाहीत. परिणामी हे खांब आता थेट रस्त्याच्या मधोमध उभे राहिले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पूर्वी रस्ता अरुंद असताना हे वीज खांब रस्त्याच्या कडेला होते. मात्र रस्ता रुंदीकरणानंतर हेच खांब आज वाहतुकीच्या मुख्य मार्गात आले आहेत. सध्या रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू असून हे वीज खांब त्या वाहतुकीसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खांब स्पष्ट न दिसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. प्रत्यक्षात अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांची या खांबांवर धडक होत असल्याच्या घटनाही घडत आहेत.
हा रस्ता शालेय मार्ग असल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात शाळेच्या बसेस, लहान वाहने तसेच पालक आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी ये-जा करतात. सकाळच्या गडबडीच्या वेळेत या खांबांमुळे मोठा धोका निर्माण होत असून अनेकदा अपघात टळता टळता वाचत आहेत, तर काही वेळा अपघात घडलेलेही आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात एखाद्या गंभीर अपघातात जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, रस्ता अपूर्ण अवस्थेत असताना नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून या कामाला सुरुवात करून दिली होती. त्या वेळी पीडब्ल्यूडीकडून काम सुरू झाल्यानंतर वीज खांब हटवले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र रस्त्याचे काम एका बाजूने जवळपास पूर्ण झाले असतानाही वीज खांब अजूनही ‘जैसे थे’ आहेत.
सध्या थंडीचे दिवस असल्याने काही काळ वीजपुरवठा बंद ठेवूनही नागरिकांना फारसा त्रास होणार नाही. मात्र जर उन्हाळ्यात हे काम हाती घेतले गेले, तर तासन्तास वीज बंद राहून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे आत्ताच, तातडीने हे वीज खांब हटविणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
पीडब्ल्यूडी, ठेकेदार आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी समन्वय साधून त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही विभागाकडून ठोस हालचाल दिसून येत नसल्याने नाराजी वाढत आहे. काही नागरिकांनी तर उपरोधिकपणे या खांबांना ‘रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या कमानी’ अशी उपमा देत, यामधून जाताना जणू स्वागत होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. मात्र ही गंमत नसून नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचे वास्तव आहे.
या मार्गावरून एसटी बस, अवजड वाहने तसेच मोठ्या प्रमाणात हेवी ट्रॅफिक सुरू असते. हा रस्ता पुढे वडकीमार्गे हैदराबाद–नागपूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडलेला असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टाळण्यासाठी तातडीने रस्त्याच्या मधोमध असलेले वीज खांब हटवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी सर्व स्तरातून होत आहे.

























