सिटी हब मिडिया वणी…
सिटी हब मीडिया वणीच्या बातमीची दखल;
नांदेपेरा रोडवरील धोकादायक वीज खांबांवर प्रशासन मौन, नगरसेवक अजय धोबे आक्रमक…
वणी शहरातील नांदेपेरा रोडवरील साई मंदिर चौक ते रेल्वे क्रॉसिंग दरम्यान सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका ठरत असल्याचा मुद्दा सिटी हब मीडिया वणीने बातमी व व्हिडीओच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर हा विषय चांगलाच ऐरणीवर आला आहे. या बातमीची दखल घेत नगरसेवक अजय पांडुरंग धोबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कडक शब्दांत निवेदन सादर करत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे.
हा परिसर प्रभाग क्रमांक १ व प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत येतो. यापैकी एका नगरसेवकाने अलीकडे या प्रश्नाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली असली, तरी उर्वरित तीन नगरसेवक अद्यापही जागृत झालेले दिसत नाहीत. नागरिकांच्या गंभीर समस्येबाबत त्यांची भूमिका सध्या उदासीन असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.या रस्त्यावरून दररोज शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, मॉर्निंग-इव्हनिंग वॉक करणारे नागरिक, तसेच ग्रामीण भागातून येणारी-जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब हे थेट अपघाताला आमंत्रण देणारे ठरत असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरसेवक अजय धोबे यांना दिलेल्या माहितीनुसार, वीज खांब हटविण्यासाठी आवश्यक ती रक्कम विद्युत मंडळाकडे आधीच जमा करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने यासाठी ठेकेदाराची नियुक्तीही केलेली आहे. मात्र असे असतानाही अद्यापपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात का झाली नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
विद्युत मंडळाचा ठेकेदार काम सुरू करत नसताना, त्याला जाब विचारणारा कोण, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पीडब्ल्यूडी, विद्युत मंडळ, ठेकेदार, नगरपालिकेचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी — सर्वच यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
“जर या हलगर्जीपणामुळे एखादी दुर्घटना किंवा जीवितहानी झाली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग आणि प्रशासनावर राहील,” असा थेट इशाराही नगरसेवक अजय धोबे यांनी दिला आहे. तातडीने खांब हटवण्यात आले नाहीत, तर लोकशाही मार्गाने आंदोलन, माध्यमांतून आवाज उठवणे तसेच वरिष्ठ व न्यायालयीन स्तरावर दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे वणी शहरातील नागरिकांच्या मनात ‘प्रशासन लोकांच्या जीवांशी खेळ करत आहे’ अशी तीव्र भावना निर्माण झाली आहे. ही असंतोषाची भावना केव्हा उफाळून येईल, याचा अंदाज सध्या कोणीही लावू शकत नाही. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडण्यापूर्वी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.

























