सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
तालुक्यातील चिखली टाकळी भागात निसर्गाने अत्यंत क्रूर रूप धारण केल्याची थरारक घटना समोर आली आहे. वादळी पावसाच्या तडाख्यात थेट अंगावर वीज कोसळल्याने एका कष्टकरी पशुपालकाला आपली जीवनयात्रा संपवावी लागली, तर त्याच्यासोबत असलेल्या १३ निष्पाप शेळ्यांचाही जागीच कोळसा झाला. चिखली टाकळी परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

काळजाचा ठोका चुकवणारी दुपार…
चिखली टाकळी गावात राहणारे विलास तुमराम हे दररोजप्रमाणे शुक्रवारी सकाळच्या सुमारास आपली गुरेढोरे घेऊन जंगलाच्या दिशेने गेले होते. दुपारच्या वेळी अचानक वातावरणात मोठा बदल झाला. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली. विलास हे स्वतःला आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत असतानाच, अचानक एका मोठ्या आवाजासह आकाशातून थेट त्यांच्यावर वीज कोसळली.

हा निसर्गाचा आघात एवढा भीषण होता की, विलास यांच्यासह त्यांच्या भोवती असलेल्या १३ शेळ्यांना वाचण्याची साधी संधीही मिळाली नाही. सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
एका झटक्यात संसार उघड्यावर…
मृत विलास हे आपल्या घराचे एकमेव कमावते आणि मुख्य आधारस्तंभ होते. शेळीपालनाच्या जीवावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. परंतु, निसर्गाच्या एकाच फटक्यात त्यांचा जीव तर गेलाच, सोबतीला त्यांच्या जगण्याचे साधन असलेल्या १३ शेळ्याही दगावल्या. या भीषण दुर्घटनेमुळे एका गरिबाचा हसताखेळता संसार काही क्षणात होत्याचा नव्हता झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, उघड्यावर आलेल्या या कुटुंबाला सरकारने तातडीने आणि मोठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.


























