सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
कुटुंबासह देवदर्शनाला जाणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले आहे. घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून आत ठेवलेले ५० हजार रुपये रोख पळवून नेल्याची खळबळजनक घटना गणेशपूर हद्दीतील अमर टाऊनशिप येथे उघडकीस आली आहे. २५ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखलगाव (सदाशिव नगर) येथील रहिवासी प्रशांतकुमार रामलु मीना (वय ४४) यांनी या प्रकरणी वणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. प्रशांतकुमार यांच्या व्यावसायिक भागीदार सरिता नारायण कोत्ता (वय ३७) या आपल्या कुटुंबासह तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. शनिवारी सकाळी शेजाऱ्यांनी सरिता यांना फोन करून त्यांच्या घरात चोरी झाल्याची शंका व्यक्त केली. त्यानंतर सरिता यांनी तत्काळ प्रशांतकुमार मीना यांना अमर टाऊनशिप येथील घरी जाऊन पाहणी करण्यास सांगितले.
प्रशांतकुमार यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, मुख्य लोखंडी गेटला कुलूप होते, मात्र मागील दरवाजा उघडा आणि त्याचे कुलूप तुटलेले आढळले. आत शिरून पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये पाहणी केली असता गोदरेजच्या कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडले होते आणि त्यातील लहान लॉकर गायब होते.
याबाबत सरिता कोत्ता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी लॉकरमध्ये ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ५० हजार रुपये रोख ठेवल्याचे सांगितले. कुटुंब चार दिवसांनंतर वणीत परत आल्यावरच रोख रकमेव्यतिरिक्त इतर काही ऐवज चोरीला गेला आहे का, हे स्पष्ट होऊ शकेल.
वणी पोलीस समोर तपास करीत आहे…

























