सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी ते मुकुटबन या ३२ किलोमीटरच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि व्यस्त मार्गावर प्रवाशांचा जीव मुठीत धरून प्रवास सुरू आहे. या मार्गावरील निर्गुडा नदीवरील पूल सध्या मृत्यूचा सांगाडा बनला असून, प्रशासकीय दुर्लक्षामुळे येथे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बांबूची मलमपट्टी, २४ तास अवजड वाहतूक!

निर्गुडा नदीवरील पुलाचा एका बाजूचा संपूर्ण कठडा (गार्डरेल) तुटून नदीत कोसळला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करण्याऐवजी प्रशासनाने तेथे केवळ बांबू बांधून मलमपट्टी केली आहे. ही तथाकथित व्यवस्था म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी सुरू असलेला खेळच आहे. सध्या निर्गुडा नदी दुथडी भरून वाहत असून, पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. रात्रीच्या वेळी अंदाज न आल्यास किंवा नजर चुकल्यास एखादे वाहन थेट नदीत कोसळून चालकाला ‘जलसमाधी’ मिळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या धोकादायक पुलावरून दिवस-रात्र अवजड वाहनांची वाहतूक अविरत सुरू आहे.
खनिज निधी अरबो रुपयांचा, पण वणीकरांच्या वाट्याला खड्डे अन् धूळ!
वणी परिसरातून दरवर्षी अरबो रुपयांचा खनिज निधी जमा होतो. मात्र, एवढा निधी येऊनही वणीकरांच्या वाट्याला भकास रस्ते आणि जीवघेणे प्रदूषणच आले आहे.
पावसाळ्यात: खड्डे, चिखल आणि पाणी साचल्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप येते.
इतर दिवसांत: उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरिक त्रस्त होतात.

प्रशासन कुणाच्या बळीची वाट पाहतंय?
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), एम एस आय डी सी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. “एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतापजनक सवाल आता नागरिक विचारत आहेत.
जनक्षोभ उसळण्याची शक्यता!
या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या आणि स्थानिकांच्या सहनशीलतेचा अंत आता झाला आहे. प्रशासनाने यावर तत्काळ ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही, तर येत्या काळात तीव्र जनक्षोभ उसळल्यास नवल वाटणार नाही, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

























