सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी-यवतमाळ राज्य महामार्गावर अपघाताला निमंत्रण देणाऱ्या त्या लोखंडी पोलीस चौकीची दखल अखेर प्रशासनाने घेतली आहे. ‘सिटी हब मिडिया’ ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर,वाहतूक विभागाने तत्काळ हालचाली करत ती चौकी रस्त्यावरून हटवून पूर्ववत सुरक्षित जागी हलवली आहे. यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून संभाव्य अपघाताची भीती आता टळली आहे.

नेमका काय होता विषय?
काही दिवसांपासून वणी-यवतमाळ रोडवरील साईबाबा मंदिराजवळ असलेली वाहतूक पोलिसांची चौकी घसरत-घसरत चक्क रस्त्याच्या मध्यभागी आली होती. राज्य महामार्ग असल्याने या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असते. ही चौकी केवळ अडथळाच नव्हती, तर रात्रीच्या वेळी वाहनधारकांसाठी जीवघेणा सापळा ठरू शकत होती. एकीकडे सामान्य नागरिकांच्या पार्किंगवर दंडात्मक कारवाई करणारे पोलीस स्वतःच्या चुकीच्या जागी असलेल्या चौकीकडे दुर्लक्ष करत असल्याचा प्रश्न ‘सिटी सब मिडिया’ ने लावून धरला होता.

बातमीची दखल आणि तत्काळ कारवाई…
हे वृत्त प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर वणीकरांनी संताप व्यक्त केला होता. याची गंभीर दखल घेत वाहतूक पोलीस विभागाने कोणतीही दिरंगाई न करता ही चौकी रस्त्यावरून बाजूला केली आहे. आता रस्ता मोकळा झाला असून वाहतूक सुरळीत झाली आहे. विशेषतः बस, ट्रक आणि शालेय वाहनांना होणारा अडथळा आता दूर झाला आहे.

पोलीस प्रशासनाचे आभार आणि अपेक्षा…
वाहतूक पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन ‘लगबगीने’ जी कारवाई केली, त्याबद्दल वणीतील नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत. सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी दाखवलेली ही तत्परता कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.
“प्रशासनाने आमची समस्या ऐकून घेतली आणि तत्काळ मार्ग काढला, ही चांगली बाब आहे. मात्र, भविष्यातही अशा तांत्रिक बाबींमुळे लोकांचा जीव धोक्यात येणार नाही, याकडे वाहतूक विभागाने सातत्याने लक्ष द्यावे,” अशी अपेक्षा वणीतील सामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.
‘सिटी हब मिडिया’ नेहमीच जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कटिबद्ध असून, यापुढेही प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवून जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी काम सुरूच राहील.

























