सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
शहरातील साई नगरी भागात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाचा स्थानिक हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यश सुगन कोचर असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, रविवारी यशचा वाढदिवस होता. मात्र, अवघ्या एक दिवसाआधीच काळाने घाला घातल्यामुळे कोचर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लग्नाहून परतल्यानंतर मित्रांसोबत मुक्काम…
मिळालेल्या माहितीनुसार, शेजारीच विवाह सोहळा असल्याने यश शुक्रवारभर लग्नाच्या गडबडीत व्यस्त होता. रात्रीच्या वेळी त्याने स्थानिक एस.बी. लॉन्स येथील स्वागत समारंभालाही हजेरी लावली. तिथून घरी परतल्यानंतर कपडे बदलून तो आपल्या काही मित्रांसह वरोरा रोडवरील हॉटेल ‘आशीर्वाद’ येथे मुक्कामासाठी निघून गेला.
रुग्णालयात आढळला बेवारस मृतदेह…
शनिवारी (१६ मे) सकाळी यशची प्रकृती अचानक बिघडल्याची आणि त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कोचर कुटुंबाला मिळाली. निरोप मिळताच कुटुंबीयांनी ग्रामीण रूग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, तिथे रुग्णालयातील एका खोलीत यशचा मृतदेह अत्यंत बेवारस स्थितीत पडलेला पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाचा मृतदेह पाहून आईने जागेवरच धास्ती घेतली, तर इतर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
व्हिसेरा राखून ठेवला; डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज…
घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत यशच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमांच्या खुणा आढळून आलेल्या नाहीत. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नसल्याने डॉक्टरांनी रासायनिक परीक्षणासाठी (Viscera) नमुने राखून शासकीय प्रयोगशाळेत पाठवले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास स्थानिक मोक्षधाम येथे यशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संशयाची सुई मित्रांकडे; पोलीस तपास सुरू…
यशचा मृत्यू नेमका कसा आणि कोणत्या परिस्थितीत झाला, हे अद्याप गूढ आहे. मात्र, घटनेनंतर त्याच्यासोबत हॉटेलच्या खोलीत थांबलेले दोन ते तीन मित्र अचानक गायब झाल्याने या प्रकरणातील संशय कमालीचा वाढला आहे.
शनिवारी पहाटेच्या सुमारास मित्र यशला आधी एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तिथून डॉक्टरांनी ग्रामीण रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्यानंतर त्याला सरकारी दवाखान्यात आणण्यात आले. परंतु, यशचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याचे मित्र मृतदेह रुग्णालयाच्या खोलीतच सोडून तिथून पसार झाले, असा थेट आरोप नातेवाईकांनी केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून वणी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

























