सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण उन्हाच्या तडाख्यामुळे वणी शहरात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. अनेक प्रभागांमध्ये नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, जनतेच्या या समस्येसाठी थेट नगरपरिषदेत धाव घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही येथील मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. सत्ताधारी पक्षाच्याच एका नगरसेविकेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनासमोर हतबल होऊन हात टेकावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने, वणी नगरपरिषदेतील ‘बेबंदशाही’ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

सत्ताधारी नगरसेविकेचे हाल; अधिकाऱ्यांची मुजोरी शिगेला!

शहरातील विविध भागात नळाला पाणी व्यवस्थित येत नसल्याने संतप्त नागरिक आपल्या भागातील नगरसेवकांकडे तक्रारी घेऊन जात आहेत. जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने नगरसेवक आणि नगरसेविका नगरपरिषदेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, येथील मुजोर अधिकारी आणि कर्मचारी लोकप्रतिनिधींच्या मागण्यांना सर्रास डावलत असून, त्यांचे फोन उचलण्याचे सौजन्यही दाखवत नसल्याची माहिती समोर आली आहे.
जेव्हा जेव्हा पाणी पुरवठ्याबाबत विचारणा केली जाते, तेव्हा ‘मोटर दुरुस्तीचे काम सुरू आहे’, ‘आज पाणी सोडतो, उद्या पाणी सोडतो’ अशी खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेली जाते. प्रत्यक्षात मात्र नळ कोरडेच राहत असल्याने नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू आहे.
पाणीपुरवठा सभापतींच्या ‘नाकाखाली’ अनागोंदी!
या संपूर्ण प्रकरणात सर्वात गंभीर आणि विशेष बाब म्हणजे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार यांच्याकडेच पाणीपुरवठा सभापती पदाची जबाबदारी आहे. असे असताना, त्यांच्याच नाकाखाली आणि त्यांच्याच पक्षाच्या सत्ताधारी नगरसेविकेला पाण्याच्या एका थेंबासाठी नगरपरिषदेत मानहानी सहन करावी लागत आहे. जर सत्ताधारी लोकप्रतिनिधींचीच ही अवस्था असेल, तर वणीतील सामान्य जनतेची दखल हे मुजोर अधिकारी आणि कर्मचारी काय घेणार? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
प्रशासक काळ संपला, पण बेबंदशाही कायम!
वणी नगरपरिषदेत प्रशासक राजवटीच्या काळात जी अनागोंदी आणि बेबंदशाही माजली होती, ती जनप्रतिनिधींचे (नगरसेवकांचे) राज्य आल्यानंतर सुतमुळात कमी होईल अशी अपेक्षा वणीकरांना होती. मात्र, लोकनियुक्त प्रतिनिधी आल्यानंतरही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मुजोरी तशीच कायम असल्याचे या घटनेवरून स्पष्ट दिसून येत आहे. प्रशासनावर पदाधिकाऱ्यांचा कुठलाही वचक राहिला नसल्याचे चित्र आहे.
आता पालिकेवर नाही, ‘वरुणेराजा’वरच आशा!
नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे आणि टँकर माफियांच्या कथित साखळीमुळे वणीकरांना आता या पालिकेकडून पाणी मिळण्याची आशा पूर्णपणे मावळली आहे. “आता ही पालिका नाही, तर थेट पावसाळाच वणीतील पाणी टंचाईच्या संकटातून नागरिकांना दिलासा देऊ शकतो,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया वणीतील सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे.


























