सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी..
कोळसा आणि खनिज संपत्तीमुळे राज्याच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वणी परिसरातील नागरिकांना आजही अत्याधुनिक आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राज्य सरकारकडे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची मागणी जोरदारपणे लावून धरली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला निवेदन सादर करण्यात आले असून, १५ दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

शिवसेनेचे वणी विधानसभा प्रमुख (सोशल मीडिया) साकेत अविनाश भुजबलराव यांनी दिलेल्या निवेदनात वणी, मारेगाव आणि झरी-जामणी या तीन तालुक्यांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

मंजुरीनंतरही रुग्णालयाचा प्रश्न रखडला…
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीनंतर आरोग्य सुविधांचे महत्त्व लक्षात घेऊन २०२१ मध्ये वणीसाठी १०० खाटांच्या रुग्णालयास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर हा निर्णय अंमलात आला नाही. त्यामुळे परिसरातील लाखो नागरिकांना अद्याप अपुऱ्या सुविधांवरच अवलंबून राहावे लागत आहे.
सहा लाख लोकसंख्येसाठी केवळ ३० खाटा…
वणी विधानसभा क्षेत्रातील तीन तालुक्यांची एकत्रित लोकसंख्या सुमारे सहा लाखांच्या घरात पोहोचली असताना आजही येथे केवळ ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. २००१ च्या जनगणनेनुसार या रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात सुविधा वाढल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार या भागासाठी १०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय आवश्यक असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
प्रदूषणामुळे आरोग्य संकट गंभीर…
वणी परिसरात कोळसा, डोलोमाइट आणि सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. त्यामुळे हवेच्या प्रदूषणाचा गंभीर परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे सांगण्यात आले. दमा, क्षयरोग, फुफ्फुसांचे विकार, हृदयरोग, मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. उन्हाळ्यात तापमान ४७ ते ४९ अंशांपर्यंत पोहोचत असल्याने उष्माघाताच्या घटनाही वाढत आहेत.
खनिज निधीचा लाभ वणीला मिळत नसल्याची तक्रार…
वणी परिसरातून मोठ्या प्रमाणावर खनिज महसूल आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधी उपलब्ध होत असतानाही स्थानिक आरोग्य सुविधा उभारण्यासाठी त्याचा पुरेसा वापर होत नसल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ज्या भागातून महसूल मिळतो, त्याच भागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
पुसदला १०० खाटा, वणीला का नाही?
पुसद येथे अनेक वर्षांपूर्वी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर झाले, मग लोकसंख्या, औद्योगिक विकास आणि प्रदूषणाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या वणीला अशी सुविधा का मिळू नये, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
निर्णय न झाल्यास आंदोलन…
वणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे तातडीने १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करून आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत शासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर जनतेच्या सहभागातून व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
“वणीकरांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवा आणि १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तातडीने मंजूर करा,” अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे.


























