सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
गौतस्करीचा बदलता पॅटर्न: आता हिंदू नावांचे आरोपी; हिंदुत्ववादी संघटना आणि पोलिसांसमोर नवीन आव्हान…
महाराष्ट्र राज्यात गौतस्करी आणि अवैध गोवंश वाहतुकीचा पॅटर्न वेगाने बदलत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. पूर्वी या गुन्ह्यांमध्ये केवळ एका विशिष्ट समुदायाचीच माणसे मोठ्या प्रमाणात सामील असायची आणि त्यामुळे अनेकदा सांप्रदायिक तणावाचे वातावरण निर्माण व्हायचे. मात्र, गेल्या काही महिन्यांत झालेल्या पोलीस कारवाया आणि दाखल झालेल्या एफआयआर (FIR) मधील ठळक नावे पाहता, आता हिंदू धर्मातील व्यक्तींची संख्या या अवैध व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

विशेषतः “वरोरा, मुकुटबन, शिरपूर, आणि झरी” तालुक्यातील तेलंगणा सीमेला लागून असलेल्या गावांमधील काही हिंदू मंडळी या अवैध गौतस्करीच्या साखळीत सामील असल्याची दाट शक्यता हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केली आहे. या भागातील गोवंश दलालांचा सुळसुळाट झाला असून, ते पैशांच्या आमिषाने स्थानिक तरुणांना या जाळ्यात ओढत आहेत. ‘गोमाता’ आणि ‘बैल हा शेतकऱ्याचा मित्र’ ही पारंपरिक संकल्पना मोडीत निघताना दिसत आहे.
१४ जुलै: डोर्ली येथील हल्ला आणि वाढता तणाव…
हा बदलता पॅटर्न केवळ आर्थिकच नाही तर हिंसक रूपही धारण करत आहे. १४ जुलै रोजी डोर्ली गावात गौरक्षक अक्षय मालेकर यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला हा गौतस्करी रोखण्याच्या रागातूनच करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे. गौवंशाने भरलेली वाहने पकडणे आणि तस्करांवर कारवाई करणे यांसारख्या कृत्यांमुळे गौरक्षकांवर हल्ला करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यानंतर गौरक्षकांमध्ये आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
हिंदुत्ववादी संघटनांना धमक्या…
गौतस्करीच्या वाढत्या प्रमाणामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना सतत धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. अवैध गौवंश वाहतूक रोखण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कार्यकर्त्यांना टार्गेट केले जात असून, त्यांच्यावर हल्ले होण्याची भीती व्यक्त केली जात आहे,तरीही ते गौतस्करी रोखण्यासाठी कटिबद्ध आहेत.
मकोका लावण्याची ताकीद आणि प्रशासनाचा कडक पवित्रा…
महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा कडकपणे लागू आहे आणि गोवंश हत्या हा गंभीर अपराध आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौहत्या आणि अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची ताकीद दिली आहे. या कडक कायद्यानंतरही केवळ पैशांच्या हव्यासापोटी या अवैध व्यवसायात हिंदू आरोपींची संख्या वाढताना दिसत आहे.
संघटनांचा पवित्रा स्पष्ट: कोणताही धर्म असो, सोडले जाणार नाही…
या बदलत्या पॅटर्ननंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट आणि आक्रमक केली आहे. “विश्व हिंदू परिषद, बजरंग दल”यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी आता पोलिसांच्या मदतीने कंबर कसली असून, त्यांनी एक नवा निर्धार व्यक्त केला आहे. गौवंशाची अवैध वाहतूक किंवा कत्तल करणारा गुन्हेगार हा केवळ गुन्हेगार असतो, त्याला कोणताही धर्म नसतो. पकडला गेलेला व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो त्याला अजिबात सोडले जाणार नाही. पोलिसांच्या मदतीने अशा प्रत्येकावर कडक कायदेशीर कारवाई करून न्यायालयाकडून शिक्षा मिळवून दिली जाईल, असे संघटनांनी स्पष्ट केले आहे.
या बदलत्या गुन्हेगारी पॅटर्नमुळे आता हा लढा केवळ दोन समुदायांमधील धार्मिक वाद न राहता, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्धचा थेट संघर्ष बनला आहे. पोलीस प्रशासन आणि जागरूक संघटना आता कोणत्याही दबावाला बळी न पडता अशा सर्व टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. डोर्ली येथील हल्ला आणि कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि पोलिसांनी याकडे गंभीरपणे लक्ष देऊन योग्य कारवाई करणे आवश्यक आहे.
(बातमीत एआई इमेज वापरली आहे…)

























