सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान देणाऱ्या वणी येथील ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाच्या स्मृतींना ४ ऑगस्ट रोजी भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. ४ ऑगस्ट १९३० रोजी पार पडलेल्या या आंदोलनाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभास माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तालुका संघचालक हरिहर भागवत, अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार, विवेक पांडे तसेच सुनील इंदुवामन ठाकरे यांनी पुष्पगुच्छ व हार अर्पण करून आदरांजली वाहिली.

वणी परिसरातील स्वातंत्र्यसंग्रामात जंगल सत्याग्रहाचा अध्याय सुवर्णक्षरांनी लिहिला गेला आहे. लोकनायक पद्मविभूषण डॉ. बापूजी अणे यांच्या प्रेरणेतून या लढ्याला बळ मिळाले. या आंदोलनाचे प्रत्यक्ष नेतृत्व वणीचे स्व. रा. गं. भागवत आणि चंद्रपूरचे डॉ. शंकरराव वैद्य यांनी केले होते. या ऐतिहासिक लढ्यात वणी तालुका काँग्रेस कमिटीचे तत्कालीन प्रमुख स्व. रवी करंदीकर (वकील) यांच्यासह डॉ. या. श्री. अणे, भ. रा. सास्तीकर आणि गो. मु. अनुरकर यांसारख्या दिग्गजांनी महत्त्वाची धुरा सांभाळली होती.
या सत्याग्रहात दा. प्र. किटकुले, जयरामपंत इंगोळे, शामरावजी पांडे, नरसुजी ढवळे, व. पां. सैनिस, दौलतराव कळसकार, शंकरराव मारोटकर, बापुराव कापर्तीवार, नारायणराव उपाध्ये, प्रल्हादपंत देशपांडे, मु. वि. देशपांडे, नत्थुजी पानसरे, त्रिंबकराव देशपांडे, सत्यनारायण मिश्रा, मोहनलाल चोपडा, रा. ना. वैद्य, पां. का. पाटील, ग. कृ. ठाकरे, वसंतराव क्षीरसागर, यादवराव कमाविसदार, वामनराव देशपांडे, शंकरराव देशपांडे, माधवराव, कृष्णराव नागदेव, सांबशिव वंगाले आणि शंकरराव मगरे यांसारख्या अनेक सैनिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
या जाज्वल्य इतिहासाची स्मृती कायम ठेवण्यासाठी वणी तालुका स्वातंत्र्यसंग्राम सैनिक समितीने एक स्मृतिस्तंभ उभारला. ४ ऑगस्ट १९९२ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्या वेळी ना. रा. भागवत, ब. ना. बोनगीरवार यांच्यासह समितीचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वातंत्र्यवीरांचा हा त्याग आणि बलिदान पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. अभिवादनादरम्यान उपस्थितांनी या योद्ध्यांच्या देशभक्तीचे स्मरण केले. हा समृद्ध इतिहास आणि वारसा जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी डॉ. जिनेंद्र भंडारी, सागर जाधव आणि अंकुश भंडारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

























