वणी नगरपरिषदेच्या मतदारयादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप मनसेने केला असून या घोळामागे पालिका प्रशासनाचे षडयंत्र असल्याचा आरोप मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी केला आहे. नवीन प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतरही मतदारयादी अद्ययावत न केल्यामुळे अनेक नागरिकांची नावे चुकीच्या प्रभागांत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊन निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अंकुश बोढे यांनी सांगितले की, “2025 च्या नगरपरिषद निवडणुकीसाठी वणीची नवीन प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक मतदाराचे नाव संबंधित प्रभागाच्या यादीत असणे आवश्यक होते. मात्र पालिकेने ही यादी अद्ययावत न करता जुनीच यादी कायम ठेवली. त्यामुळे एका प्रभागात राहणाऱ्या मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागाच्या यादीत दिसत आहेत. हा प्रकार नागरिकांना मतदारयादीच्या गोंधळात गुंतवून ठेवण्याचा आणि प्रशासनाला मनमानी कारभाराची मुभा देण्याचा प्रयत्न आहे.”
बोढे यांनी पुढे सांगितले की, “मतदारयादीवरील आक्षेप नोंदवण्यासाठी 13 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. मात्र त्याआधीच प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन नवीन प्रभाग रचनेनुसार यादी सुधारित करावी. प्रत्येक मतदाराचे नाव त्याच्या वास्तव प्रभागात योग्यरीत्या नोंदवले गेले, तरच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहील.”
जर प्रशासनाने ही चूक त्वरित दूर केली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा बोढे यांनी दिला आहे.
या प्रसंगी मनसेचे कृष्णा निमसटकर, शंकर पिंपळकर, सुरज पळसकर, प्रवीण बोतरा, सुजल तिवरी, अहमद रंगरेज, स्वयंम ठाकरे, नवीन पिंपळकर, श्रेयश वारारकर, योगेश ताडम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

























