शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक — शासनाला तातडीने निर्णय घेण्याची मागणी
वणी, ता. 27 ऑक्टोबर:
कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर होत चाललेल्या समस्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी सोमवारी काँग्रेसतर्फे वणी तहसील कार्यालयात आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या वेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
खाडे यांनी सांगितले की, “कापूस व सोयाबीन हे विदर्भातील शेतकऱ्यांचे मुख्य पिक आहे. मात्र शासनाच्या निर्णयातील विलंब आणि ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेतील अडचणींमुळे अनेक शेतकरी सीसीआय व नाफेडच्या खरेदी नोंदणीपासून वंचित राहत आहेत. शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.”
काँग्रेसने प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या मांडल्या —
1. सीसीआय कापूस खरेदी नोंदणीसाठी तात्काळ मुदतवाढ द्यावी.
2. मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे.
3. नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी नोंदणी प्रक्रिया तातडीने सुरू करावी.
काँग्रेसने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधेचा अभाव असल्याने ऑनलाइन नोंदणी करताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच मार्डी परिसरात खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना लांब अंतरावर जाऊन उत्पादन विकावे लागत असून, त्याचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
दरम्यान, नाफेडकडून सोयाबीन खरेदीची प्रक्रिया अद्याप सुरु नसल्याने बाजारात शेतकऱ्यांना अत्यल्प दर मिळत आहेत. त्यामुळे शासनाने या विषयाकडे गांभीर्याने पाहून तत्काळ नोंदणी सुरू करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
निवेदन सादर करताना पुरुषोत्तम आवारी, अशोक चिकटे, राजू अंकतवार, प्रफुल्ल उपरे, प्रमोद वासेकर, प्रमोद लोणारे, सुधीर खंडाळकर, कैलास पचारे, पलाश बोंडे, महादेव पडोळे, एस. पेंदोर, विप्लव तेलतुंबडे, प्रेमनाथ मंगाम, अनंता डंभारे, नरेंद्र चिकटे, दिनेश पाहुनकर, सुनील वरारकर, प्रशांत गोहोकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
📰 City Hub Media
-
[gtranslate]


























