सिटी हब मिडिया वणी…
गेल्या चार वर्षांपासून वणी शहरासह संपूर्ण तालुक्यात प्रशासनाचा कारभार सुरू आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या तिन्ही ठिकाणी प्रशासकीय नियंत्रण असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत. नागरिकांना पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, वीजपुरवठा, घरकुल योजनांसह विविध शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी वर्गाकडून विलंब व मनमानी कारभारामुळे लोकांच्या कामांची दखल घेतली जात नसल्याची नाराजी वाढत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या तातडीने निवारणासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे 6 नोव्हेंबर 2025 रोजी ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. हा जनता दरबार यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून घेण्यात येत असून, नागरिकांच्या सर्व प्रकारच्या शासकीय व स्थानिक समस्या नोंदवून त्यांच्या तात्काळ तोडग्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
या कार्यक्रमानंतर दुपारी 3 ते 5 वाजता भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी व नागरिक शिवसेना परिवारात प्रवेश करणार असून, पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार आहे.
शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी सांगितले की,
“गेल्या चार वर्षांत प्रशासकीय यंत्रणा केवळ कागदोपत्री काम करत आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरीकांचे प्रश्न केवळ निर्णयपत्रकावर सुटत नाहीत. त्यासाठी जनतेचा आवाज थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. या उद्देशाने जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून, प्रत्येक वणीकर नागरिकाने यात सहभागी व्हावे.”
वणी तालुक्यातील सर्व नागरिकांना आपले प्रश्न, अडचणी किंवा प्रलंबित कामे मांडण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी केले आहे –
📞 राजु रिंगोले – 92848 81655
📞 विक्की बोलचेटवार – 99221 65885
शिवसेना जनसंपर्क कार्यालय, वणी विधानसभा (घर संसार सेल जवळ, जैन मंदिर समोर)
शहरातील नागरिक, व्यापारी वर्ग, महिला मंडळे, युवक व सामाजिक संस्था यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्यांचे मांडणी करावी आणि जनता दरबाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

























