सिटी हब मिडिया वणी…
निवडणूक संपली, आता विकासाला प्राधान्य; प्रभाग ९ मध्ये राजकीय मतभेद विसरून जनतेसाठी संयुक्त पुढाकार…
निवडणूक संपल्यानंतर राजकीय मतभेद बाजूला ठेवत प्रभागातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा सकारात्मक संदेश प्रभाग क्रमांक ९ मधून पुढे आला आहे. शिवसेनेचे निखिल खाडे व प्रभाग ९ च्या विद्यमान नगरसेविका उबाठाच्या किरण देरकर यांनी एकत्र येत नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
निखिल खाडे यांनी प्रभाग क्रमांक ९ मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी निराश न होता जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.
आज प्रभागातील काही नागरिकांनी खांबावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याची तक्रार निखिल खाडे यांच्याकडे केली. या बंद स्ट्रीट लाईटमुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. तक्रार मिळताच निखिल खाडे यांनी तात्काळ ही बाब नगरसेविका किरण देरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनीही तत्परतेने नगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देत कारवाईचे आदेश दिले. परिणामी बंद असलेल्या स्ट्रीट लाईटची तात्काळ दुरुस्ती करण्यात आली आणि प्रभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
निखिल खाडे व नगरसेविका किरण देरकर यांच्या समन्वयातून प्रभागातील एक महत्त्वाची समस्या त्वरित मार्गी लागली. निवडणूक संपल्यानंतर राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून जनहितासाठी काम केल्यास समस्यांचे निराकरण किती सहज शक्य होते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
या प्रसंगी निखिल खाडे यांनी सांगितले की, “प्रभागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. नागरिक कधीही मला भेटू शकतात. जनतेच्या सेवेत मी कायम उपलब्ध असेन.”
जर प्रत्येक प्रभागात निवडणुकीनंतर सर्व राजकीय पक्षांनी अशाच प्रकारे समन्वय साधत जनतेच्या हितासाठी काम केले, तर नागरिकांच्या समस्या अल्पावधीत सुटू शकतात, असा आशावादही यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.

























