सिटी हब मिडिया वणी…
‘अजित पवारांसारखा नेता पुन्हा होणे शक्य नाही’ वणीतील शोकसभेमध्ये सर्वपक्षीय भावना व्यक्त…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, वणी शहरातील टिळक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आयोजित शोकसभेमध्ये सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकसभेमध्ये एकच सूर उमटला की, विकासाची दृष्टी, स्पष्ट भूमिका आणि जनतेशी नाते असलेला अजित पवारांसारखा नेता पुन्हा होणे शक्य नाही.

शोकसभेमध्ये उबाठा शिवसेनेचे वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले,“अजित पवार यांच्याशी माझा २५ वर्षांचा जुना सहवास होता. राष्ट्रवादीत असताना त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात काम केले. ते कार्यकर्त्यांना ओळखत होते, आपुलकीने वागत होते. आठ दिवसांपूर्वीच त्यांची भेट झाली होती. इतका मोठा धक्का संपूर्ण महाराष्ट्रासाठी असून, ही पोकळी कधीही भरून निघणार नाही.”
यावेळी त्यांनी आठवण सांगितली की त्यांच्या बँकेच्या उद्घाटनप्रसंगी अजित दादा स्वतः वणीला आले होते. तसेच एकदा कोणालाही न सांगता अजित दादा गुप्तपणे त्यांच्या घरी आले, जेवण करून निघून गेले. हा त्यांचा अत्यंत साधेपणा आणि आपुलकीचा गुप्त दौरा होता, अशी आठवण संजय देरकर यांनी सांगितली.
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की २०१४ ते २०२४ या काळात त्यांचे अजित पवार यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. निधीसाठी गेल्यावर ते स्पष्टपणे सांगायचे की इतकाच निधी मिळेल; मात्र वणीसाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही.
अजित दादा जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा ताण यायचा. त्यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारला योग्य तयारी करूनच बोलावे लागायचे. अजित दादा विधानसभेमध्ये आठ–आठ तास बसून काम करत होते. त्यांचा राजकीय अभ्यास अत्यंत सखोल होता. त्यांच्याकडे विकासात्मक दृष्टी होती आणि प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनच ते विधानसभेमध्ये येत होते. त्यांच्या ठाम भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांचीही घाम फोडत होती. आज त्यांना श्रद्धांजली देताना अजित दादा आज आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नसल्याचे सांगताना ते भावूक झाले होते.
शिवसेना शिंदे गटाचे संघटन मंत्री विजय चोरडिया यांनी सांगितले की अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. ते फक्त महायुतीचे नेते नव्हते, तर संपूर्ण भारताचे नेते होते. त्यांच्याकडे रचनात्मक व विकासात्मक दृष्टी होती आणि त्याच दृष्टीकोनातून त्यांचे कार्य सुरू होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजू उंबरकर यांनी सांगितले की अजित दादांची काम करण्याची शैली अशी होती की युवा वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होत होता. उकणी परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्यावर ते स्वतः वणीमध्ये आले आणि अधिकाऱ्यांना तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले व शेतकऱ्यांना दिलासा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आशिष मोहितकर यांनी सांगितले की अजित पवार यांना वणीतील मुक्तांगण निसर्गरम्य परिसराच्या उद्घाटनासाठी बोलवण्याचा त्यांचा मानस होता; मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते.
काँग्रेस नेते देविदास काळे यांनी सांगितले की अजित दादांसारखा जनतेसाठी झटणारा, स्पष्ट बोलणारा नेता पुन्हा होणे शक्य नाही.
शोकसभेमध्ये उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून अजित पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते.
याप्रसंगी भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. सुत्रसंचलन भाजपचे शहराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले व सर्व उपस्थितांचे आभार मानले…

























