सिटी हब मिडिया वणी…
वणी शहराच्या बाजारपेठेमध्ये 500 रुपयांच्या नकली नोटांचा सुळसुळाट होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून, आज घडलेल्या एका घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. थेट बँकेच्या एटीएममधून नकली नोट निघाल्याने आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वागदरा येथील रहिवासी दीपक शंकरराव येडलावार यांनी आज ॲक्सिस बँकेच्या एटीएममधून 5,000 रुपये काढले. त्यांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असून एटीएममधून त्यांना 500 रुपयांच्या दहा नोटा मिळाल्या. मात्र नोटा तपासल्यानंतर त्यातील एक नोट संशयास्पद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या नोटीची लांबी, रुंदी व छपाई इतर नोटांपेक्षा वेगळी दिसत होती.

याबाबत दीपक येडलावार यांनी तत्काळ ॲक्सिस बँकेत चौकशी केली. बँकेकडून तपासणी केल्यानंतर संबंधित नोट नकली असल्याचे स्पष्ट झाले. ही बाब लक्षात येताच बँकेने तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. तसेच दीपक येडलावार यांचे आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन त्यांच्या तक्रारीची नोंद उच्च पातळीवर पाठवण्यात आली.
बँकेकडून त्यांना असे आश्वासन देण्यात आले आहे की, दोन ते तीन दिवसांत निर्णय घेऊन संबंधित 500 रुपये परत दिले जातील किंवा त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील. सध्या ती नकली नोट बँकेकडे जमा करण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर आणखी गंभीर बाब समोर आली असून, ॲक्सिस बँकेत उपस्थित प्रतिनिधीला यावेळी आणखी दोन नकली 500 रुपयांच्या नोटा दाखवण्यात आल्या, ज्यावर ‘Fake’ असा शिक्का मारलेला होता. त्यामुळे वणी शहरात नकली नोटांचा प्रश्न किती खोलवर रुजलेला आहे, याबाबत शंका निर्माण होत आहे.
बँक व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, एटीएममध्ये नोटा भरण्याची जबाबदारी बँकेची नसून, ती कंत्राटी कंपनीकडे असते, जी एटीएमचे संपूर्ण हँडलिंग करते. संबंधित कंपनीमार्फतच नोटा एटीएममध्ये भरल्या जातात, अशी माहिती ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापक मंडळाने दिली.
नोटबंदीनंतर अशा प्रकारांमध्ये घट झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा बाजारात नकली नोटा आढळू लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. भविष्यात अशा घटना वाढल्यास सामान्य जनतेवर आर्थिक व मानसिक दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे वणीकर नागरिकांनी विशेषतः दुकानदारांनी व्यवहार करताना नोटा नीट तपासून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच या गंभीर प्रकरणाची पोलीस व प्रशासनाने दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दीपक येडलावार यांच्यासोबत घडलेली घटना इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नये, यासाठी सर्वांनी सावध राहणे आज अत्यंत आवश्यक झाले आहे.

























