सिटी हब मिडिया वणी…
राज्यात कमी पटसंख्या असल्याचे कारण देत अनेक मराठी शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF) ने या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता यवतमाळ येथे मोठ्या एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मोर्चा यवतमाळ येथील श्रमशक्ती भवन येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असून, शासनाच्या शिक्षण धोरणाविरोधात निवेदन सादर करण्यात येणार आहे. मराठी शाळा टिकवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती संघटनेने दिली.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, शिक्षकांची संख्या केवळ पटावर आधारित निश्चित करण्याचे धोरण मागे घ्यावे आणि दत्तक शाळा योजनेद्वारे होणारे शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे, अशा प्रमुख मागण्या या आंदोलनातून मांडल्या जाणार आहेत.
तसेच राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी, शिक्षकांना अध्यापनाशिवाय इतर कामांमध्ये गुंतवू नये, शाळांमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक, इंटरनेट, खेळाचे साहित्य आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेत सुधारणा करावी, अशा मागण्यांचाही समावेश निवेदनात करण्यात आला आहे.
याशिवाय शिक्षण क्षेत्रावर सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या किमान ६ टक्के निधी खर्च करण्याची मागणी करण्यात आली असून, शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषय सक्तीने लागू करू नये तसेच नरेंद्र जाधव समिती रद्द करावी, अशी मागणीही करण्यात येणार आहे. केरळ राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
या मोर्चात मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कॉ. अथर्व निवडिंग (राज्य कौन्सिल सदस्य), अयान शाह (जिल्हा समन्वयक), अभिजित नगराळे, रोशनी कांबळे, पियुष सोनुले, अनुष्का आत्राम, भुवनेश्वरी चामाटे, प्रेम ठेंगणे, कृष्णा यनगंदेवार, भुषण गणविर आदी एआयएसएफ पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

























