सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
२००६ च्या विस्थापनानंतर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या निलजई येथील मूळ प्रकल्पग्रस्तांच्या रोजगारावर आता बाहेरील मंडळी डल्ला मारत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. राजकीय दबावाचा वापर करून स्थानिकांचा हक्क हिरावणाऱ्या खासगी कंपन्या आणि प्रशासनाविरोधात आता निलजई ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

संघर्षातून उभे राहिलेले ‘निलजई’…
२००६ मध्ये जेव्हा निलजई गावाचे पुनर्वसन झाले, तेव्हा ९०% लोकांनी मोबदला घेऊन इतरत्र स्थलांतर केले. मात्र, अवघ्या ५० कष्टकरी कुटुंबांनी “आपले गाव नकाशावर जिवंत ठेवू” या जिद्दीतून निलजईची पुनर्स्थापना केली. सर्व जमीन कोळसा खाणीत (WCL) गेल्यामुळे रोजगाराचे कोणतेही साधन नसताना, या मजुरांनी ५-६ वर्षे अत्यंत हालाखीत काढली.
प्रकल्पग्रस्तांच्या घामावर ‘बाहेरच्यांचे’ अतिक्रमण?
अलीकडच्या काळात WCL च्या माती उपसा (OB Removal) कामासाठी खासगी कंपन्या गावात दाखल झाल्या. जेव्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, तेव्हा जे लोक गाव सोडून गेले होते किंवा जे गावाबाहेरील आहेत, त्यांनी राजकीय वजन वापरून या कंपन्यांमध्ये शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ज्यांनी गाव वाचवण्यासाठी वनवास भोगला, त्या मूळ प्रकल्पबाधित मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
प्रशासनाला धरले धारेवर…
आपल्या हक्काचा रोजगार हिरावला जात असल्याचे लक्षात येताच, गावातील आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केले. “आमचा हक्क, आमचा रोजगार” अशी गर्जना करत ग्रामस्थांनी कंपनीला धारेवर धरले. जोपर्यंत मूळ गावकरी आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनात प्रमुख उपस्थिती:
या आंदोलनाचे नेतृत्व माजी सरपंच श्री. मंजूभाऊ भा. डंभारे यांनी केले. यावेळी सरपंच सुचीता रा. टेकाम, प्रशांत निंदेकर, माजी उपसरपंच अनिलभाऊ स. कोत्तावार, सौ. जयमालाताई नं. दर्वे, संजयभाऊ जांभुळकर यांच्यासह सर्व निलजई ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“आम्ही आमचे गाव वाचवले, जमीन दिली आणि आता हक्काचा रोजगारही देणार नाही का? बाहेरच्यांचा राजकीय दबाव नीलजईच्या मातीत चालणार नाही.” > — ग्रामस्थ, निलजई

























