सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. वणी तालुक्यातील पळसोनी येथे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी छापा टाकून भारत सरकारने प्रतिबंधित केलेले अनधिकृत कापूस बियाणे जप्त केले आहे. या कारवाईत तब्बल १ लाख १५ हजार ७० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण पथकाला पळसोनी येथे अवैध बियाण्यांची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे दि. ६ मे २०२६ रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास अरुण शंकर भट (वय ४५, रा. पळसोनी) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या झडतीमध्ये घरामध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या नावाखाली विकले जाणारे, परंतु प्रत्यक्षात प्रतिबंधित असलेले ‘एचटीबीटी’ (HTBT) सदृश अनधिकृत कापूस बियाणे आढळून आले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल…
कारवाई दरम्यान एकूण ८१ पाकिटे बियाणे जप्त करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खालील वाणांचा समावेश आहे:
माऊली-५ आणि ५जी: १४ पाकिटे
सुरक्षा कॉटन सीड्स: १५ पाकिटे
धूम-२ (पांढऱ्या पाकिटातील): १९ पाकिटे
कावेरी ५जी आणि गॅलक्सी हायपर: १९ पाकिटे
तसेच सिल्व्हर ५जी, जंबो ५जी, आर-६५९ आणि हरियाली ७०२ यांसारख्या वाणांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या साठ्यापैकी प्रत्येक वाणाचे २ नमुने पुढील तपासणीसाठी सीलबंद करून बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
कायदेशीर कारवाई…
या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांच्या तक्रारीवरून आरोपी अरुण भट याच्याविरुद्ध बियाणे अधिनियम १९६६, बियाणे नियम १९६८ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील विविध कलमान्वये (कलम ७, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५ व १६) वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तपास अधिकारी: या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश चिकराम (पोलीस स्टेशन, वणी) करीत आहेत.
शेतकऱ्यांना आवाहन: अनधिकृत बियाण्यांमुळे जमिनीचा पोत बिघडण्याची आणि पीक निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे आणि पक्के बिल आवर्जून घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

























