सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
आगामी २०२७ च्या राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात सुरू असलेल्या घरगणनेच्या प्रक्रियेत इतर मागासवर्गीय (OBC) समाजाची स्वतंत्र नोंद घेण्याबाबत केंद्र सरकारने संदिग्धता ठेवल्याचा आरोप वणीतील ‘लढा संघटने’ने केला आहे. सरकार घरगणनेच्या नावाखाली ओबीसींची दिशाभूल करत असून, या संदर्भातील गोंधळ तात्काळ दूर करावा, या मागणीसाठी संघटनेचे मुख्य समन्वयक प्रवीण खानझोडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला एक महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले.

३३ प्रश्नांच्या यादीत ‘OBC’ संवर्ग गायब; नागरिक संभ्रमात…

भारताच्या महानिबंधक (RGI) कार्यालयाने २२ जानेवारी २०२६ रोजी जाहीर केलेल्या अधिकृत राजपत्रानुसार, सध्या देशात घर यादीकरण आणि घरगणनेची प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत प्रगणकांमार्फत नागरिकांना ३३ प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नावलीतील जात आणि सामाजिक गटाशी संबंधित रकान्यामध्ये केवळ अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांचाच स्पष्ट पर्याय देण्यात आला आहे.

दुसरीकडे, ओबीसी, भटक्या जमाती (NT), विमुक्त जाती (VJ), आणि विशेष मागास प्रवर्ग (SBC) या सर्व मोठ्या लोकसंख्येला स्वतंत्र स्थान न देता, थेट ‘इतर’ (Others) या एकाच सामायिक रकान्यात टाकण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे ओबीसी समाजात तीव्र असंतोष पसरला असून, ही एक प्रकारे समाजाची फसवणूक असल्याचा सूर निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
“३० एप्रिल २०२५ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने जातनिहाय जनगणनेला मंजुरी दिल्याचे जाहीर केले होते. स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मीडियासमोर याची पुष्टी केली होती. परंतु, २०२६ च्या अधिकृत राजपत्रात मात्र ओबीसींचा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. मग सरकारचा खरा हेतू काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.”
— प्रवीण खानझोडे (लढा संघटना, वणी)
सुधारित राजपत्र काढण्याची मागणी…
ओबीसी समाजाची अचूक आणि स्वतंत्र आकडेवारी समोर येण्यासाठी केंद्र सरकारने या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप करून एक सुधारित राजपत्र (Revised Gazette) जारी करावे, तसेच जातनिहाय जनगणनेत ‘OBC’ साठी स्वतंत्र रकाना देऊन समाजातील संभ्रमावस्था संपवावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देताना उपस्थित मान्यवर:
या प्रसंगी लढा संघटनेचे प्रवीण खानझोडे यांच्यासह सुरेश मांडवकर, राजू तूरनाकर, सुरेंद्र घागी, गुलाब झाडे, वासुदेव पारखी, रवींद्र उपरे, रेव्ह. रोशन मलया गारपेल्लीवर, नियाज अली, जफर खान, विजय बोबडे, आकाश दुबे, मोहन महाकुळकर (परमडोह), गौरव वाभिटकर (परमडोह) यांच्यासह वणी परिसरातील असंख्य ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























