सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
वणी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासन व प्रशासनाने चालवलेल्या अक्षम्य दुर्लक्षाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येत्या **१ जुलै रोजी वणी येथे भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’** काढण्यात येणार आहे. या आंदोलनाची अधिकृत घोषणा आणि रुपरेषा मांडण्यासाठी वणीत एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या पत्रकार परिषदेला आमदार संजय देरकर, जिल्हाप्रमुख संजय निखाडे, जिल्हा युवासेना अध्यक्ष समीर लेनगुळे, सुधीर थेरे, विनोद ढुमणे, शरद ठाकरे यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, मोर्चाच्या नियोजनासाठी बोलावलेल्या या पत्रकार परिषदेत नुकतीच ‘पलटी’ मारणारे नेते संजय देशमुख यांचा राजकीय विषय सर्वाधिक गाजला.

### पत्रकार परिषदेत मांडलेले जनसामान्यांचे सर्व प्रमुख मुद्दे:
पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून निवेदने, आंदोलने आणि बैठका घेऊनही सरकारने केवळ आश्वासनांची खैरात केली आहे. प्रत्यक्ष पदरात काहीच पडले नसल्याने आता रस्त्यावर उतरून हिशोब मागण्याची वेळ आली आहे. या मोर्चात खालील मागण्यांवर जोरदार आवाज उठवला जाणार आहे:
* **शेतकरी व वीज समस्या:** फसव्या कर्जमाफीच्या जाचक अटींमुळे शेतकरी वंचित आहेत. शेतीसाठी अत्यंत आवश्यक असणारा १२ तास वीजपुरवठा केला जात नाही. तसेच यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा योजनेतून वगळून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. खत वितरणातील जाचक अटी दूर कराव्यात.
* **महिला व घरकुल योजना:** ‘लाडकी बहीण’ योजनेत अनेक पात्र महिलांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले आहे. यासोबतच वाढते इंधन दर कमी करावेत, घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तात्काळ द्यावेत आणि मोफत रेतीचा प्रश्न निकाली काढावा.
* **पाणीपुरवठा व अमृत योजना:** वणी शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून ‘अमृत योजने’तील गैरव्यवहार आणि ‘जलजीवन मिशन’च्या रखडलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
* **स्थानिक रोजगार आणि अमली पदार्थांचा विळखा:** वणी परिसरातील खाणींमध्ये स्थानिक सुशिक्षित तरुणांना डावलून परप्रांतीयांना रोजगार दिला जात आहे, तो थांबवावा. तसेच परिसरात ड्रग्ज आणि इतर घातक अमली पदार्थांचे जाळे वेगाने पसरत असताना प्रशासनाची कारवाई अत्यंत अपुरी पडत आहे.
* **धोकादायक उड्डाणपूल आणि रस्ते:** वणी-चिखलगाव-मुकुटबन मार्ग तसेच वरोरा रेल्वे क्रॉसिंग येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. सुरक्षित सर्विस रोड नसल्याने दररोज अपघात होत असून लोकांच्या जिवाशी चाललेला हा खेळ तातडीने थांबवावा.
* **प्रदूषण व इतर मागण्या:** रेल्वे सायडिंगमुळे वाढणारे घातक प्रदूषण रोखावे, वेकोलि व इतर कंपन्यांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, ओव्हरलोड कोळसा वाहतुकीवर पूर्णपणे बंदी घालावी, एसटीबीटी-५जी बियाण्यांना मान्यता द्यावी, वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवावे, स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी आणि नगर परिषदेकडून सुरू असलेल्या अन्यायकारक अतिक्रमण हटाव मोहिमेला आळा घालावा.
संजय देशमुखांच्या ‘पलटी’वर आमदार देरकरांची नाराजी, तर निखाडेंचा थेट इशारा…
मोर्चाच्या विषयासोबतच पत्रकार परिषदेत संजय देशमुख यांच्या पक्षबदलाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर नेत्यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली.
“संजय देशमुख यांनी ऐनवेळी घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांनी पक्षासोबत असे करायला नको होते.”
आमदार संजय देरकर…
तर, जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी अत्यंत आक्रमक आणि संतापजनक पवित्रा घेत थेट जाहीर इशारा दिला.
**”संजय देशमुख यांनी पाठीत खंजीर उपसला आहे. ते जर आता वणी मतदारसंघात आले, तर त्यांचे कपडे फाडून त्यांच्या थेट कानशिलात वाजवू!”**
संजय निखाडे, जिल्हाप्रमुख…
जनतेला महासागरासारखे रस्त्यावर उतरण्याचे आवाहन…
शासन आणि प्रशासनाने या जाहीर इशाऱ्यानंतरही दुर्लक्ष केल्यास हा जनआक्रोश अधिक तीव्र आणि हिंसक रूप धारण करेल. हा मोर्चा केवळ आंदोलन नसून अन्याय, भ्रष्टाचार, निष्क्रियता आणि जनविरोधी धोरणांविरोधातील लोकशाहीचा एल्गार आहे. त्यामुळे १ जुलै रोजी वणीतील या आंदोलनात तालुक्यातील प्रत्येक शेतकरी, महिला, तरुण आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आले आहे.


























