सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
जनतेच्या हितासाठी पक्षाच्या भिंती ओलांडून आजी आमदार संजय देरकर व माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार एकत्र; वणीकरांना दिसले सुखद चित्र…

काही महिन्यांपूर्वीच शहरातील ‘नमो उद्याना’च्या उद्घाटनावरून दोन्ही नेत्यांचे गट आमनेसामने आले होते. एकमेकांच्या समर्थकांनी बॅनरबाजी करत राजकीय श्रेय घेण्यासाठी मोठी चढाओढ लावली होती. त्या वेळचे ते तणावाचे राजकीय वातावरण पाहता, हे दोन्ही नेते एकत्र येतील अशी सुतराम शक्यता नव्हती. मात्र, राजकारण फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित असावे, हे दाखवून देत वणी विधानसभा क्षेत्राचे आजी आमदार संजय देरकर आणि माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी काल जुन्या वादावर पडदा टाकला. वणीकरांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आले, जे वणीकरांसाठी अत्यंत सुखद आणि दिलासादायक चित्र होते.

समितीच्या दौऱ्यात उमटला एकच सूर…
वणी आणि चंद्रपूर परिसरातील वेकोली (WCL) मुळे झालेल्या शेतजमिनींचे नुकसान, पिकांची नासाडी आणि वाढत्या प्रदूषणाच्या समस्येची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गठीत केलेली अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांची एक सदस्यीय समिती वणीमध्ये दाखल झाली होती. या समितीसोबत आसपासच्या गावांमध्ये आणि बाधित परिसरात पाहणी करत असताना दोन्ही नेत्यांचा सूर एकच होता. पक्ष जरी वेगळे असले, तरी वणीची जनता आणि शेतकरी हे आपल्याच कुटुंबातील सदस्य आहेत, याच भावनेने दोन्ही नेत्यांनी अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि राज्याचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे खालील मागण्या एकाच ताकदीने लावून धरल्या:
योग्य नुकसान भरपाई: वेकोलीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा आणि जमिनींचा योग्य मोबदला तात्काळ मिळावा.
जमिनीच्या बदल्यात नोकरी: ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीने संपादित केल्या आहेत, त्यांच्या वारसांना तात्काळ नोकऱ्या मिळाव्यात.
प्रदूषणातून मुक्ती: वणीकर जनता वर्षानुवर्षे कोळशाच्या प्रदूषणामुळे त्रस्त आहे, या प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करण्यात यावी.
रेल्वे सायडिंग हटवा: वणी शहराच्या आरोग्याशी खेळणारी रेल्वे सायडिंग शहरापासून दूर हलवण्यात यावी.
सोफ्यावर शेजारी बसून ऐकल्या जनतेच्या समस्या…
केवळ शेतापातावरच नाही, तर त्यानंतर महसूल विभागात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीतही हे दोन्ही नेते एकाच सोफ्यावर शेजारी बसून होते. अधिकाऱ्यांसमोर वणीकरांच्या समस्या मांडताना आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील, याच्या सूचना करताना दोन्ही नेत्यांमध्ये कमालीचा समन्वय दिसून आला. कालपर्यंत उद्यानाच्या उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई लढणारे हेच हात आज शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एकत्र आलेले पाहून उपस्थितही भारावून गेले होते.
“राजकीय मतभेद कितीही असले, तरी वणीच्या आरोग्यासाठी आणि विकासासाठी आमच्यात कोणतेही ‘मनभेद’ नाहीत,” असाच संदेश या दोन्ही नेत्यांनी आपल्या कृतीतून दिला.
वणीकर जनतेतून कौतुकाचा वर्षाव आणि नवा आशावाद…
निवडणुकीच्या पलीकडे जाऊन जनतेसाठी एकत्र येणाऱ्या या ‘वणी पॅटर्न’चे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. “अशीच परिपक्वता भविष्यातही कायम राहावी. कुठल्याही जनहितार्थ किंवा विकासकामात राजकारण आडवे न आणता, वणीचा विकास, प्रदूषणातून मुक्तता आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी हे दोन्ही नेते नेहमी एकत्र काम करतील,” असा दृढ आशावाद आता वणीच्या सामान्य जनतेकडून व्यक्त केला जात आहे.


























