सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
उद्घाटनाचे दौरे पुरे झाले…आता वणीच्या जनतेच्या दारी या,नगराध्यक्ष महोदया!

सहा महिने उलटले; शंभर दिवसांचा अजेंडा कुठे गेला? वणीकरांचा संतप्त सवाल…
“मुख्य अतिथी” म्हणून उद्घाटन समारंभ, सत्कार, निवेदन स्वीकारणे आणि विविध कार्यक्रमांना उपस्थिती… एवढेच नगराध्यक्षपदाचे काम आहे का? असा संतप्त सवाल आता वणीकर जनता विचारू लागली आहे. सत्ता मिळून तब्बल सहा महिने उलटले, मात्र शहरातील रस्ते, नाल्या, अस्वच्छता, पाणीटंचाई आणि रखडलेली विकासकामे पाहता वणीत बदल नेमका कुठे झाला, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
प्रशासकाच्या कार्यकाळात शहराची झालेली वाताहत दूर करण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी वणीकरांनी भाजपला नगराध्यक्ष पदासह स्पष्ट बहुमत दिले. जनतेने विश्वास दाखवला, पण त्या विश्वासाचे प्रत्यक्ष कामात रूपांतर अद्याप दिसत नसल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.
शहरातील अनेक भागांत रस्त्यांची दयनीय अवस्था कायम आहे. गल्लीबोळात घाणीचे साम्राज्य, अनेक ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा, आरोग्याला धोका निर्माण करणारी अस्वच्छता आणि कासवगतीने सुरू असलेली विकासकामे यामुळे नागरिक त्रस्त आहेत. लोकप्रतिनिधी मात्र प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यापेक्षा कार्यक्रमांमध्ये अधिक व्यस्त असल्याची टीका होत आहे.
नगरपरिषदेत सामान्य नागरिकांची कामे सहज होत नाहीत, अशी तक्रार अनेकांकडून ऐकायला मिळत आहे. ठेकेदार आणि दलालांचा प्रभाव वाढल्याची चर्चा शहरात सुरू असून, या तक्रारींची दखल घेऊन पारदर्शक कारभार उभा करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवरच आहे.
नगराध्यक्ष महोदया राजकारणात नवख्या असल्या, तरी आता सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे.कार्यालयातही नियमितपणे येतात पण माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार आणि भाजप शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाचे काय झाले असा प्रश्न ही उपस्थित होतो,या सर्वांनी व इतर अनुभवी व वरिष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन करत प्रशासनाला गती देणे अपेक्षित होते.मात्र त्याचे परिणाम अद्याप ठळकपणे दिसत नसल्याचे नागरिकांचे मत आहे.
नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबतही विविध चर्चा सुरू आहेत. प्रशासनावर लोकप्रतिनिधींची प्रभावी पकड आहे का, असा प्रश्न निर्माण होत असून, नगरसेवकांमध्येही याबाबत नाराजी असल्याची चर्चा आहे.
शिक्षिका म्हणून काम केलेल्या नगराध्यक्षांकडून नगरपरिषद शाळांमध्ये सकारात्मक बदलांची अपेक्षा होती. मात्र काही शाळांमधील स्वच्छतेच्या समस्यांकडे अद्याप पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याची तक्रार पालकांकडून होत आहे.
पदग्रहणावेळी जाहीर करण्यात आलेला “शंभर दिवसांचा अजेंडा” आज नेमका कुठे आहे? त्या आराखड्यातील किती कामे पूर्ण झाली? नागरिकांसमोर त्याचा लेखाजोखा का मांडला जात नाही? या प्रश्नांची उत्तरे आता वणीकर मागत आहेत.
वणीकरांना आता भाषणे, उद्घाटने आणि आश्वासने नकोत; त्यांना स्वच्छ रस्ते, नियमित पाणी, दर्जेदार सुविधा आणि वेगवान विकास हवा आहे. नगराध्यक्ष महोदयांनी कार्यालयाबाहेर पडून प्रत्येक प्रभागात फिरावे, नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकाव्यात आणि प्रशासनाला कामाला लावावे, अशी जनतेची अपेक्षा आहे.
सहा महिने संपले… आता तरी कामाला सुरुवात होणार, की उद्घाटनांचे फोटो आणि भाषणेच सुरू राहणार? हा प्रश्न आज प्रत्येक वणीकर विचारत आहे.
(सदर बातमी जनतेत वावरत असताना जनतेच्या प्रतिक्रियांवर आधारित आहे.)

























