वणीच्या जत्रा मैदानावर दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराला शेकडो वर्षाची परंपरा आहे या आठवडी बाजारात भाजीपाल्या सह अनेक प्रकारच्या विविध जीवनोपयोगी सामानाची खरेदी विक्री होत असते व सोबतच शाकाहारी, मांसाहारी पदार्थ ही विक्री साठी राहतात.
पूर्वी या सगळ्या कारभारात मराठी माणूस खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होत होता, पंचक्रोशीतील मराठी व्यापारी,ग्राहक या बाजारात दर रविवारी येत होते व आवश्यक वस्तूंची खरेदी विक्री करून जात होते व स्थानिक अर्थव्यवस्थेला ही हातभार लागत होता तसेच वणीच्या बाजारपेठत ही आवक जावक जास्त होत होती व्यापारी ही रविवारी चांगला व्यापार होतो म्हणून रविवारच्या आठवडी बाजार भरण्याची वाट बघत होते,एकंदरीत समाधानकारक वातावरण होतं…
पण हळूहळू मागील काही वर्षांपासून मराठी माणूस या बाजारापासून दुरावला आहे दुकानदार तर मराठीच जास्त आहे पण ग्राहक आता मराठी माणसांपेक्षा युपी, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश येथील परप्रांतीय मजूर आहेत व या लोकांच्या भरोश्यावरच हा आठवडी बाजार सुरू आहे जर ही मंडळी काही कारणास्तव आपापल्या प्रांतात परत गेली तर आठवडी बाजार ओसाड पडलेल्या स्थितीत दिसून येतो व स्थानिकही आठवडी बाजाराकडे जास्त फिरकत नाही.
खेड्यापाड्यातून येणाऱ्या दुकानदारांना याचे कारण विचारले तर ते म्हणतात की आता वणी मध्येच जागोजागी भाजीपाला व इतर सामान चौकाचौकात मिळू लागल्याने मराठी व स्थानिक लोकांचा कल आठवडी बाजाराकडे कमी झाला आहे, आता ज्यांना या आठवडी बाजाराचे आकर्षण वाटते तीच मंडळी बाजारात येते सहसा स्थानिक दिसत नाही…
नवीन पिढीला तर या बाबतीत माहिती ही कमी असेल की आठवडी बाजारात फिरण्याची, खाण्यापिण्याची मज्जा काय असते…


पूर्वी पूर्ण मैदानावर भरणारा हा आठवडी बाजार आता संकुचित होत चालला आहे या आठवडी बाजाराला आता परत मराठी माणसाने उभारी देणे काळाची गरज आहे परप्रांतीयांच्या भरोश्यावर हा बाजार सध्या चालतोय ही परिस्थिती बदलली पाहिजे व आपल्या माणसांना साथ दिली पाहिजे परप्रांतीयांसोबत स्थानिक ही बाजारात आले तर आपलाच शेतकरी सुखावणार त्याला शिल्लक माल फेकावा लागणार नाही तर एकदा दर रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराचे गतवैभव परत आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे…

























