सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…
शहराच्या स्वच्छतेची आणि नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्याच अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या नाकाखाली स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे धक्कादायक चित्र प्रभाग क्रमांक १० मध्ये पाहायला मिळत आहे. या प्रभागाचे प्रतिनिधित्व स्वतः नगरपरिषदेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक अनिल चिंडालिया आणि दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या नगरसेविका आरती वांढरे करत आहेत. मात्र, एवढे वजनदार लोकप्रतिनिधी असूनही या प्रभागातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे.

आमदारांच्या घराजवळच दुर्गंधीचे साम्राज्य…
विशेष म्हणजे, आमदार संजय देरकर यांच्या घराजवळच ही मुख्य कचराकुंडी आहे.(येमुलवार व राजुरकर यांच्या घरांच्या मधात)आमदार, आरोग्य सभापती आणि अनुभवी नगरसेविका असा मोठा लवाजमा या प्रभागात वास्तव्यास किंवा संपर्कात असतानाही नगरपरिषद प्रशासन या समस्येकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.तसेच जवळच आदर्श माध्यमिक शाळा आहे तिथूनच शेकडो विद्यार्थी येणे जाणे करतात त्यांच्या आरोग्यावर ही घाणीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे…
पावसाळ्यात परिस्थिती बिकट, घरात राहणेही कठीण…
सध्या येथील कचराकुंडी नेहमीच घाणीने आणि ओल्या-सुक्या कचऱ्याने माखलेली असते. कचराकुंडीची खोली जास्त असल्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचून राहते. परिणामी, कचरा कुजल्यामुळे परिसरात प्रचंड तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
पाऊस आला की हा सर्व कचरा पाण्यात वाहून थेट मुख्य रस्त्यावर येतो.
वाऱ्यामुळे प्लास्टिक आणि इतर कचरा उडून थेट स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर जनावरांचा (गुरेढोरे) मुक्त संचार असतो, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताची भीतीही वाढली आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढला; नागरिकांचे आरोग्य धोक्यात…
पाणी साचून राहिल्याने या भागात डास आणि मच्छरांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे परिसरात डेंग्यू, हिवताप (मलेरिया) आणि गॅस्ट्रोसारख्या साथीच्या आजारांचे सावट पसरले असून, स्थानिक बालकांचे व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
निवेदने कचऱ्याच्या टोपलीत? नगराध्यक्षांकडेही साकडे…
या गंभीर समस्येबाबत त्रस्त नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला अनेकदा लेखी निवेदने दिली आहेत. स्वतः नगराध्यक्ष विद्याताई आत्राम यांची भेट घेऊन त्यांनाही या समस्येचे गांभीर्य समजावून सांगत त्वरित कारवाईची विनंती करण्यात आली होती. मात्र, अद्यापपर्यंत प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. नागरिकांच्या तक्रारींना प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
“स्वतः आरोग्य सभापती ज्या प्रभागात राहतात किंवा प्रतिनिधित्व करतात, तिथेच जर अशी नरकयातना नागरिकांना सहन करावी लागत असेल, तर संपूर्ण शहराच्या स्वच्छतेचा देवच जाणे! प्रशासनाने तात्काळ ही कचराकुंडी साफ करून योग्य नियोजन करावे…स्थानिक रहिवासी,प्रभाग क्र. १०

























