सिटी हब मीडिया वणी…
वणी नगरपरिषद निवडणुकीनंतर घडलेल्या एका राजकीय घटनेमुळे शहराच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अपक्ष उमेदवार अब्दुल हफिज उर्फ टापू यांनी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांची घेतलेली भेट आणि त्यासंदर्भात काही माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे चर्चांना वेग आला होता.
काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला की अब्दुल हफिज उर्फ टापू यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील नगरपरिषदेला पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भातील काही छायाचित्रेही सोशल मीडियावर व्हायरल झाली. या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातच काही प्रमाणात नाराजीचे सूर उमटल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, या सर्व चर्चांवर माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले,
“अब्दुल हफिज उर्फ टापू यांनी केवळ सदिच्छा भेट घेतली होती. त्यांनी माझ्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. मी त्यांना वणीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करू, असे आश्वासन दिले आहे. त्यांनी मला पाठिंबा दिला किंवा मी त्यांचा पाठिंबा घेतला, असे म्हणणे चुकीचे आहे. वणीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, हीच माझी भूमिका आहे.”
यानंतर अपक्ष नगरसेवक अब्दुल हफिज उर्फ टापू यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,
“मी प्रभाग क्रमांक ९ मधून अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने माझ्या प्रभागाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू नये, ही माझी भूमिका आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी मला माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार तसेच भाजपचे सहकार्य आवश्यक आहे. म्हणूनच मी सदिच्छा भेट घेतली. भविष्यात नगरपालिकेत माझ्या सहकार्याची आवश्यकता भासल्यास, मी वणीच्या विकासासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहीन.”
ते पुढे म्हणाले की, या भेटीकडे वेगळ्या राजकीय अर्थाने पाहू नये. “आमचे ध्येय एकच आहे—प्रभाग क्रमांक ९ चा विकास आणि वणीचा सर्वांगीण विकास. यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, अब्दुल हफिज उर्फ टापू यांनी प्रस्थापितांना धक्का देत प्रभाग क्रमांक ९ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. भाजप समर्थित उमेदवारासह शिवसेना उमेदवारांचा पराभव करत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळेच त्यांनी अचानक घेतलेली संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्यासोबतची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
मात्र आता दोन्ही नेत्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केल्यानंतर, ही भेट कोणत्याही राजकीय सौदेबाजीसाठी नसून केवळ वणीच्या विकासासाठी घेतलेली सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात वणीच्या विकासासाठी आवश्यक तेव्हा सर्वजण एकत्रितपणे काम करणार असल्याचा निर्धार दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आला आहे.

























