सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
समृद्धी महामार्गावर काळाचा घाला: चंद्रपूरच्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा भीषण अपघातात अंत…

समृद्धी महामार्गावर रविवारी दुपारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बंद पडलेल्या ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिल्यामुळे चंद्रपूर येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात संपूर्ण जीवने कुटुंब जागीच संपल्याने चंद्रपूरच्या बाबुपेठ परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.

बदलीचा पदभार स्वीकारण्यासाठी जात असतानाच अपघात…
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या बाबुपेठ येथील रहिवासी असलेले भास्कर जीवने हे डब्ल्यूसीएल (WCL) भटाळी येथे वर्कशॉप प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी आरती जीवने या शासकीय सेवेत असून त्यांची नुकतीच अकोला येथे बदली झाली होती. पत्नीच्या नवीन नियुक्तीचा पदभार स्वीकारण्यासाठी भास्कर जीवने हे आपल्या कुटुंबासह कारने (क्र. MH 34 BF 1346) अकोल्याच्या दिशेने निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
नियंत्रण सुटले आणि घात झाला…
धामणगाव रेल्वे जवळील चॅनेज क्रमांक १०५ जवळ एक ट्रक (क्र. NL 01 AK 7123) नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभा होता. यादरम्यान जीवने यांची कार या मार्गावरून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट उभ्या असलेल्या कंटेनरवजा ट्रकला जाऊन मागून धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
अपघातातील मृतकांची नावे:
१. महादेव जिवाजी जीवने (वय ६५ वर्षे)
२. लताबाई महादेव जीवने (वय ६० वर्षे)
३. भास्कर महादेव जीवने (वय ४३ वर्षे)
४. आरती भास्कर जीवने (वय ४१ वर्षे)
५. जीज्ञा भास्कर जीवने (वय १२ वर्षे)
घटनास्थळी पोलिसांची धाव…
अपघाताची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस आणि वाहतूक पथकाने तातडीने घटनास्थळ गाठले. स्थानिक प्रशासनाने कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढले. एकाच घरातील तीन पिढ्यांमधील पाच लोकांचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे वृत्त चंद्रपुरात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


























