सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
ग्रामीण भागातून वणी शहरात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे होणारी परवड थांबण्याचे नाव घेत नाहीये. बसेसच्या अनिश्चित वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आक्रमक झाली असून, आगार प्रशासनाला समस्या निवारणासाठी ७२ तासांचा (३ दिवस) अल्टिमेटम दिला आहे.

परिसरातील खेड्यापाड्यांतून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या मुला-मुलींना दररोज वेळेवर गाड्या न मिळणे, शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत बसफेऱ्या नसणे आणि सुटल्यानंतर तासनतास बसस्थानकावर ताटकळत राहावे लागणे अशा गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी अभाविपच्या शिष्टमंडळाने थेट वणी आगारात धडक दिली.
यावेळी आगार व्यवस्थापक यवतमाळ दौऱ्यावर असल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी थेट फोनवरून संपर्क साधत परिस्थितीची भीषणता मांडली. त्यानंतर आगारातील कर्मचाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले.
प्रमुख मागण्या व आंदोलनाचा इशारा:
शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळेनुसार ग्रामीण मार्गांवर पुरेशा व नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात.
प्रशासनाने ३ दिवसांच्या आत ठोस कृती आराखडा जाहीर करावा.
वेळेत सकारात्मक पाऊल न उचलल्यास चौथ्या दिवशी वणी बसस्थानक परिसरात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.
यावेळी नयन क्षीरसागर, अंकित भालेराव, शितेश गोवारकर यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते आणि त्रस्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; प्रशासनाने तात्काळ मार्ग न काढल्यास आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी आगाराची असेल,” असा सज्जड दम यावेळी देण्यात आला.

























